Ticker

6/Breaking/ticker-posts

करोनाची तिसरी लाट नेमकी कधी येणार ?; 'या' मंत्र्याने केले भाकित..

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

कोल्हापूर: राज्याला आता करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचा अंदाज तज्ञ व्यक्त करत आहेत. सरकारने देखील तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त करत या लाटेशी दोन हात करता यावेत यासाठी तयारी सुरू केली आहे. तिसरी लाट केव्हा येण्याची शक्यता आहे, याबाबत तज्ञ विविध मते व्यक्त करीत आहेत. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील. यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे सतेज पाटील यांनी म्हटले आहे. ही संभाव्य लाट थोपवून धरण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.


राज्यातील करोना रुग्णांची संख्या स्थिरावल्यासारखी दिसत असली तरी देखील या संख्येत चढ-उतार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण देशात केरळनंतर महाराष्ट्रातील सक्रिय रुग्णांची संख्या दुसऱ्या स्थानी आहे. सध्या राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५२ हजार ८४४ वर आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये करोना संसर्ग नियंत्रणात असल्याचे दिसत असले तरी काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्येने उचल खाल्ल्याचेही दिसत आहे. आता सणासुदीचे दिवस येत असून या दिवसांमध्ये लोकांचा संपर्क वाढल्यास करोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी सर्वाधिक रुग्ण होते. यावेळी २९ हजार रुग्णसंख्या गृहित धरून तयारी करण्यात आली आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात येणार आहे असे सतेज पाटील म्हणाले. कोल्हापूर जिल्ह्यात ८० टक्के लसीकरण पार पडले आहे, अशी माहिती देतानाच ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येईल असे ते म्हणाले.

केरळमधील ओणम या सणानंतर तेथील रुग्णसंख्या अचानक वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही सणांमुळे असे होऊ नये यासाठी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.

केंद्र सरकारला टोला

तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवत असताना सतेज पाटील यांनी भाजपच्या मंदिर आंदोलनावरही टीका केली. भाजपने १०० टक्के लसीकरण मिळावे यासाठी शंखनाद आंदोलन करावे, मात्र या आंदोलनापेक्षा केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त लशीच्या मात्रा मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या