Ticker

6/Breaking/ticker-posts

अनिल परब यांना आताच नोटीस कशी ?; संजय राऊतांचा गंभीर आरोप


 





लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाने ईडी आज नोटीस बजावली असून यावरून राजकारण तापू लागलं आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना अत्यंत धारदार शब्दांत यावर प्रतिक्रिया दिली आहे.


राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट सचिन वाझेला दिल्याचा आरोप झाला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी हा आरोप केला आहे. याप्रकरणी सीबीआय आणि ईडी या केंद्रीय तपास यंत्रणांकडून तपास सुरू असून याच प्रकरणात ईडीने आता अनिल परब यांना नोटीस बजावल्याचे सांगण्यात येत आहे. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ईडीच्या मुंबईतील कार्यालयात हजर राहण्याची सूचना या नोटिशीत देण्यात आली आहे. यावर संजय राऊत यांनी ट्वीटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे.


'शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भूकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. घटनाक्रम कृपया समजून घ्या... कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू. जय महाराष्ट्र', असे ट्वीट करत संजय राऊत यांनी कायदेशीरपणेच या नोटीसला सामोरे जाणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांना रत्नागिरीत अटक झाली. या रत्नागिरी जिल्ह्याचे अनिल परब हे पालकमंत्री आहेत. त्यामुळे वरच्या सरकारचं जे लव्ह लेटर आलं आहे ते कसं आलं, हे आमच्या लक्षात आलं आहे. आम्ही काही गुन्हेगार नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. ही सगळी लढाई आम्ही कायद्यानेच लढू, असे राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना सांगितले. आम्ही नॉर्मल माणसं आहोत. त्यामुळे आम्ही काही कुणाला धमक्या देणार नाही. नॉर्मल माणसे कायद्याने चालतात. तसेच याबाबतीतही आम्ही करू. जे सत्य आहे ते समोर येईलच आणि जे बनावट आहे त्याचा पर्दाफाशही होईल, असे सांगत सूचक इशाराही राऊत यांनी दिला.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या