Ticker

6/Breaking/ticker-posts

भाजपला जोर का झटका ! गदारोळ केल्याप्रकरणी १२ आमदार निलंबित

 *अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धक्काबुक्की, शिवीगाळ गैरवर्तन केल्याप्रकरणी १२ आमदार निलंबित

*कारवाईचा निषेध करत भाजपचा सभात्याग



लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 मुंबई: विधानसभा सभागृहात गोंधळ घालतानाच तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या तब्बल १२ सदस्यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आलं आहे. त्यात आशिष शेलार, गिरीश महाजन, जयकुमार रावल, संजय कुटे या माजी मंत्र्यांचाही समावेश आहे.


विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाशी संबंधित एक ठराव मांडला. केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डेटा मिळवण्यासंबंधी हा ठराव होता. त्यास भाजपच्या सदस्यांनी जोरदार विरोध केला. त्यावेळी काही सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला. तालिका अध्यक्षासमोरचा माइक व राजदंड पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सभागृह तहकूब झाल्यानंतरही हे सदस्य शांत झाले नाहीत. त्यांनी अध्यक्षांच्या दालनातही गोंधळ घातला. अध्यक्षांना शिवीगाळ केली. स्वत: तालिका अध्यक्षांनी ही माहिती देत तीव्र नाराजी व्यक्त केली.

भाजप सदस्यांच्या या गैरवर्तनाची गंभीर दखल घेत सत्ताधारी पक्षानं निलंबनाचा ठराव आणला. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी हा ठराव मांडला. हा ठराव आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला. त्यानुसार, भाजपच्या १२ सदस्यांना एक वर्षासाठी सभागृहातून निलंबित करण्यात आलं आहे. त्यात संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, पराग अळवणी, हरीश पिंपळी, राम सातपुते, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, कीर्तिकुमार (बंठी) भांगडिया यांचा समावेश आहे. निलंबित सदस्यांना पुढील वर्षभर मुंबई व नागपूर विधिमंडळाच्या आवारात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईचा निषेध केला. ' भाजपच्या सदस्यांच्या निलंबनाचा ठराव म्हणजे विरोधकांचं संख्याबळ जाणीवपूर्वक कमी करण्याचा डाव आहे. हा लोकशाहीचा खून आहे. काही सदस्यांनी गैरवर्तन केलं असेल तर अध्यक्षांनी त्यांच्याशी चर्चा करायला हवी. थेट निलंबन करणं योग्य नाही,' असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर भाजपनं कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या