Ticker

6/Breaking/ticker-posts

महाराष्ट्रातील लसीकरण नरेंद्र मोदींमुळेच; भाजप नेत्याचा दावा

 *भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा दावा

*करोना काळातील मोदींच्या कामाचं केलं कौतुक






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 अहमदनगर: ‘प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेने मराठा, ओबीसी समाजातील विद्यार्थ्‍यांसाठी ५० टक्‍के शुल्क माफ करण्‍याच्‍या निर्णयामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या विचारांचीच प्रेरणा आहे. राज्‍यातील मंत्री लसीकरणाचे श्रेय घेत असले तरी, हे लसीकरण केवळ मोदीजींच्‍या निर्णयामुळे पूर्ण होऊ शकले, हेच सत्‍य आहे,’ अशा शब्दांत माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयांचे कौतुक केले.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेने चालू शैक्षणिक वर्षात व्‍यवसायिक महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या शिर्डी विधानसभा मतदारसंघातील मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्‍यांसाठी ५० टक्‍के शुल्क माफ करण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल भाजपच्या ओबीसी आघाडीच्‍या वतीने विखे पाटील यांचा सत्‍कार करण्‍यात आला. त्यावेळी विखे बोलत होते.

विखे पाटील म्‍हणाले, ‘पंतप्रधान मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्र सरकारने या देशातील सामान्‍यातील सामान्‍य माणसाला विकासाच्‍या मुख्‍य प्रवाहात आणण्‍यासाठी निर्णय घेतले आहेत. ३४ वर्षांनंतर या देशाला नवीन शैक्षणिक धोरण मिळाले. आज या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होत आहे. नव्‍या शैक्षणिक धोरणातही प्रत्‍येक समाज घटकातील विद्यार्थी हा शिक्षणाच्‍या प्रवाहात यावा हाच विचार शैक्षणिक धोरणात आहे. पंतप्रधानांच्‍या प्रेरणादायी विचारातून प्रवरा संस्‍थेच्‍या माध्‍यमातून मराठा, ओबीसी समाजातील विद्यार्थ्‍यांसाठी फी माफ करण्‍याचा निर्णय घेतला आहे. राज्‍यातील सर्व खासदार, आमदारांना आपण पत्र पाठवून त्‍यांनीही त्‍यांच्‍या मतदार संघात असे निर्णय करण्‍याबाबत विनंती केली आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

मोदींच्या कामाचे कौतुक करताना ते म्हणाले, ‘देशाला पुढे घेऊन जाण्‍यासाठी केंद्र सरकार घेत असलेल्‍या निर्णयांमुळेच राष्‍ट्रहिताबरोबरच सामाजिक‍ हित जोपासले जात आहे. करोना संकटातही या देशाला वाचविण्‍यासाठी पंतप्रधानांनी घेतलेले निर्णय सर्वच समाज घटकांच्‍या हिताचे ठरले. आज देशात ४३ कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. महाराष्‍ट्रातही ४ कोटी लोकांचे पूर्ण झाले. राज्‍यातील मंत्री लसीकरणाचे श्रेय घेत असले तरी, हे लसीकरण केवळ मादीजींच्‍या निर्णयामुळे पूर्ण होऊ शकले, हेच सत्‍य आहे,’ असेही विखे पाटील यांनी सांगितले.

ओबीसी आघाडीचे प्रदेश सचिव नंदकुमार जेजूरकर, प्रदेशाचे उपाध्‍यक्ष प्रकाश चित्‍ते, जिल्‍हाध्‍यक्ष बाळासाहेब गाडेकर, शिर्डीचे नगराध्‍यक्ष शिवाजीराव गोंदकर, भाजपाचे उपाध्‍यक्ष नितीन कापसे, भाजयुमोचे तालुका अध्‍यक्ष सतिष बावके, किसान आघाडीचे तालुका प्रमुख बाळासाहेब डांगे, महिला जिल्‍हाध्‍यक्षा पुष्‍पलता हरिदास, कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्‍यक्ष रविंद्र चव्‍हाण, श्रीरामपूर बाजार समितीचे संचालक मनोज हिवराळे यांच्‍यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या