Ticker

6/Breaking/ticker-posts

साखर उद्योगाने ऑक्सिजन उत्पादनात पुढाकार घ्यावा; मुख्यमंत्री ठाकरे यांचे आवाहन

 







लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क   )

 औरंगाबाद : राज्याला ऑक्सिजन उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी मिशन ऑक्सिजनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. साखर उद्योगाने ऑक्सिजन निर्मितीच्या क्षेत्रांत पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी शुक्रवारी केले.

चोराखळी (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथील धाराशिव साखर कारखान्यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केले. केंद्रीय रस्ते विकास आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख व्हीसीव्दारे सहभागी झाले होते. कारखाना स्थळावर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार कैलास पाटील, कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, अविनाश महागांवकर, एस. व्ही. पाटील, मौज इंजिनिअरिंगचे ओक आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की करोनाविरुद्धचा पहिला लढा आपण जिंकला आहे. पहिल्या लाटेत आपण मोठ्या प्रमाणावर तपासणी प्रयोगशाळा उभारल्या. कोविड केअर सेंटर उभारले, बेडची क्षमता वाढवली. पण दुसऱ्या लाटेचे आव्हान मोठे आहे. मात्र आता राज्याच्या विविध भागातून येणारे अहवाल पाहिले असता आता या लाटेवरही आपण मात करू शकू, असा विश्वास आहे. त्यासाठी आपण ऑक्सिजन निर्मितीमध्ये स्वावलंबी व्हायला हवे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आपल्या राज्यात बाराशे मेट्रिक टन ऑक्सिजन निर्माण होतो. आपली गरज साधारणतः सतराशे मेट्रिक टन आहे. पण आपल्याला तीन हजार मेट्रिक टन निर्मिती करायची आहे. तरच आपण स्वावलंबी होऊ शकू. राज्यातील विविध महापालिकांमध्ये ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आता सहकार, उद्योग क्षेत्राने यामध्ये पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. साखर कारखान्यातील ईथेनॉल प्रकल्पात काही फेरबदल करुन विकसित करण्यात आलेला हा प्रकल्प करोनाविरुद्धच्या लढ्यात अतिशय महत्वाचा आहे. यापासून इतर उद्योग आणि सहकारी साखर कारखान्यांनी प्रेरणा घ्यावी, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

गडकरी म्हणाले, की ऑक्सिजन निर्मिती साठी डिस्टलरी बंद केली जाऊ नये. पन्नासहून आधिक बेड असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प अनिवार्य करावा. प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक असणारा ऑक्सिजन त्या जिल्ह्यातच निर्माण होईल, यावर भर द्यावा. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की धाराशिव कारखान्याने उभारलेला प्रकल्प या संकटात अतिशय महत्त्वाचा आहे. या प्रकल्पामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील गरज पूर्ण होईल. त्याचबरोबर इतर जिल्ह्यांमध्येही पुरवठा केला जाऊ शकतो. अन्य कारखान्यांनी अशा प्रकारे प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. कारखान्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक असणारी परवानगी आणि नियमावलीत बदल करण्याबाबत संबंधित विभागांनी तत्काळ कार्यवाही करावी. यामुळे ऑक्सिजन निर्मिती करण्याची प्रक्रिया आधिक गतिमान होईल.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री शंकरराव गडाख यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी प्रास्ताविक केले. आमदार कैलास पाटील यांनी आभार मानले.

असा आहे प्रकल्प

* इथेनॉल प्रकल्पात बदल करुन ऑक्सिजन प्रकल्पात रुपांतर
*ऑक्सिजन निर्मिती करणारा पहिला साखर कारखाना
*दररोज सहा टन ऑक्सिजनची निर्मिती होणार

*ऑक्सिजनची शुद्धता ९६ टक्के

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या