Ticker

6/Breaking/ticker-posts

' पवारांसारखी माणसं आज काँग्रेसमध्ये नसतील तर त्यास जबाबदार कोण?'

 








लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 मुंबई: पाच राज्यांतील निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नेते व कार्यकर्त्यांना नुकतंच मार्गदर्शन केलं. काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीवर चिंता व्यक्त करतानाच पक्षात काही सुधारणा कराव्या लागतील, असं मत त्यांनी व्यक्त केलं. सोनिया गांधी यांच्या याच वक्तव्याचा आधार घेत शिवसेनेनं काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. राज्यातील काँग्रेस नेत्यांना चिमटाही काढला आहे.

 केरळ व आसाममधील काँग्रेसच्या पराभवानंतर शिवसेनेनं काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली होती. संजय राऊत यांना आम्ही गंभीरपणे घेत नाही आणि सामना वाचत नाही, असं पटोले म्हणाले होते. आजच्या अग्रलेखातून शिवसेनेनं याच मुद्द्यावरून काँग्रेस नेत्यांना टोला हाणला आहे. 'महाराष्ट्रातले काँग्रेसचे पुढारी सामनावाचत नसल्याचा टेंभा मिरवत असले तरी पण सोनिया गांधी सामनाची दखल घेतात, हे त्यांच्या वक्तव्यातून दिसून आलं आहे. जे प्रश्न 'सामना'नं उपस्थित केले होते, तेच सोनियांनी उपस्थित केले आहेत, असा दावा शिवसेनेनं केला आहे.

' काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्य लढ्यातून लोकांत व देशात रुजला. स्वातंत्र्य लढ्यातील संघर्षानं अनेक सामान्य कार्यकर्तेही मोठे झाले, पण त्या छोट्यांचे नेतृत्व करणारी मंडळी थोर होती. दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव, राम मनोहर लोहिया, नाना पाटील हे सर्व एके काळी काँग्रेसचे धुरंधर होते. महाराष्ट्रातील शरद पवार यांनी उभी हयात काँग्रेस पक्षात घालवली. आज अशी माणसे काँग्रेस पक्षात उरली नसतील तर त्यास जबाबदार कोण? प. बंगालात ममता बॅनर्जी, आसामात हेमंत बिस्व सरमा, पुद्दुचेरीत एन. रंगास्वामी हे मूळचे काँग्रेसी असलेले नेते इतरत्र जाऊन मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले, यास जबाबदार कोण? असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

' पक्षाला पूर्णवेळ अध्यक्षाची गरज आहे, असं म्हणणाऱ्या काँग्रेसमधील जी-२३’ (ज्येष्ठ नेत्यांचा एक गट) गटालाही शिवसेनेनं टोला हाणलाय. 'अध्यक्ष असला नसला तरी पक्ष हा चालतच असतो. जमिनीवरचे कार्यकर्ते पक्षाचा झेंडा पुढे नेत असतात. सरकारला प्रश्न विचारून भंडावून सोडणे हे एक महत्त्वाचे काम आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी त्या कामी पुढाकार घ्यायला हवा,' असं शिवसेनेनं म्हटलंय.

राहुल गांधीं यांचं कौतुक

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं शिवसेनेनं कौतुक केलं आहे.
' राहुल गांधींचा लढा एकाकी आहे. ते त्यांचं काम संयमानं करतात. त्यांच्यावर प्रचंड टीका घाणेरड्या शब्दांत होत असताना मुद्द्याला धरून लढत राहतात. करोना काळात राहुल गांधी यांनी घेतलेल्या अनेक मुद्द्यांवर सरकार पक्षाकडून टीकेची झोड उठली, पण लसीकरणापासून पुढं इतर अनेक विषयांत सरकारनं राहुल गांधींचीच भूमिका स्वीकारली. राहुल गांधी हेच आजही काँग्रेसचे सेनापती आहेत. त्यांचे सरकारवरील हल्ले अचूक आहेत,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या