Ticker

6/Breaking/ticker-posts

महाराष्ट्रावर संकटं, तृप्ती देसाई म्हणाल्या.. ‘ मुख्यमंत्र्यांना परमेश्वरानं शक्ती द्यावी ’

 







लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 अहमदनगर : महिलांना मंदीर प्रवेश आणि महिलांच्या हक्कांसंबंधीच्या विविध मागण्यासंबंधी आंदोलने करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा  तृप्ती देसाई यांनी आता वेगळ्याच कारणासाठी परमेश्वराला साकडं घातलं आहे. महाराष्ट्रावर सध्या संकटामागून संकटं येत असून यातून राज्याला बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना परमेश्वरानं शक्ती द्यावी,’ असं साकडं देसाई यांनी घातलं आहे.

 देसाई यांनी म्हटलं आहे, ‘मागील वर्षीपासून महाराष्ट्रावर आलेलं करोनाचं संकट, निसर्ग चक्रीवादळ, टोळधाड, शेतकऱ्यांवर आलेली नैसर्गिक संकटं यातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला सुरक्षित बाहेर काढत संकटमोचन म्हणून काम केलं. परंतु यावर्षी पुन्हा आलेलं करोनाचं भयंकर संकट, नुकतेच आलेलं चक्रीवादळ अशी संकटं आली आहेत. अजून किती संकटं येणार आहेत माहिती नाही. परंतु आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राला पुन्हा एकदा सुरक्षितपणे या संकटांतून बाहेर काढण्यासाठी परमेश्वरानं शक्ती द्यावी, हीच आमच्या नागरिकांच्या वतीनं प्रार्थना आहे.

शनिशिंगणापूर येथील शनी चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देणे, शिर्डी येथील साईबाबा संस्थांनने भाविकांसाठी केलेल्या ड्रेस कोड विरोधातील आंदोलन, महिलांच्या विरोधात वक्तव्य केले म्हणून कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या विरोधातील आंदोलन, महिला अत्याचाराचे आरोप झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांविरोधातील भूमिका अशी अनेक आंदोलने देसाई यांनी केली आहेत. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांसोबतच सध्या राज्यात सत्तेवर असलेल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांच्याही रोषाला त्यांना अनेकदा सामोरे जावे लागले आहे. अनेकदा अटकेच्या कारवाईला समोरे जावे लागले आहे. भाजप शिवसेनेचे सरकार असताना आणि आता महाविकास आघाडीचे सरकार असतानाही त्यांची आंदोलने मोडून काढण्याचाच सरकारकडून प्रयत्न झाला.

अशा परिस्थितीत देसाई यांनी मुख्यमंत्र्यांची बाजू उचलून धरली आहे. ही संकटे हातळण्यात राज्य सरकार आणि मुख्यमंत्री अपयशी ठरत असल्याचे आरोप विरोधकांकडून वारंवार होत आहेत. या पार्श्वभूमीवर देसाई यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतूक करून त्यांच्यासाठी परमेश्वराला साकडं घातलं आहे. मात्र
, यामध्ये उध्दव ठाकरे यांचे नाव घेण्याचं टाळत केवळ मुख्यमंत्री पद म्हणून त्यांनी हे साकडं घातलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या