Ticker

6/Breaking/ticker-posts

करोनाची दुसरी लाट रोखण्याचे आव्हान ; मुख्यमंत्र्यांनी केले महत्त्वाचे आवाहन

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई: करोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने केलेली नियमावली, उपाययोजना यांची वस्तुनिष्ठ माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवतानाच माध्यमांनी जनजागृती करावी. साथीच्या आजाराचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा लढा यशस्वी करूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

विविध माध्यमांमध्ये आरोग्य विषयक पत्रकारीता करणाऱ्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी दृरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी करोना नियंत्रणाबाबत, आरोग्य व्यवस्था, औषधांची उपलब्धता, करोना चाचण्या, लसीकरण आदी विविध मुद्द्यांवर अनुभव कथन करतानाच काही सूचनाही केल्या. त्या सूचनांचे स्वागत करतानाच हा संवाद यापुढेही कायम ठेवण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, करोनाच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वाधिक रुग्णवाढ महाराष्ट्रात होत आहे. ही रुग्णवाढ थांबविण्यासाठी राज्य शासन अनेक उपाय योजना करीत आहे. नियमावली जाहीर केली आहे. लोकांना त्याविषयी सोप्या भाषेत माहिती देताना करोना नियंत्रणासाठी अनावश्यक गर्दी टाळणे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे या सूचनांचे पालन करणे किती आवश्यक आहे हे समजून सांगायची आवश्यकता आहे. माध्यमांनी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

करोना विरुद्धची लढाई एकट्या शासनाची नसून त्यात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे. करोना विरुद्धच्या या लढ्यात उपाययोजना, नियमावलींमध्ये सुधारणा व्हावी यासाठी माध्यमांचा सूचनात्मक सहभाग असावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लसीकरणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोस नंतर किती जणांना पुन्हा करोनाची बाधा झाली, याविषयी अभ्यास करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला केल्या. राज्यातील नागरिकांना प्रबोधनातून दिलासा देतानाच करोनाला रोखण्यासाठी एकत्र येवूया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

करोना रोखण्यासाठी शासन करीत असलेल्या उपाययोजनांबाबत लोकमन तयार करण्याच काम माध्यम प्रतिनीधींनी करावे, असे सांगतानाच करोनाकाळात राज्यातील शासकीय आरोग्य संस्थांमधील मोतीबिंदू शस्त्रक्रिया, नेत्र उपचार विभाग बंद राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी दिली. राज्य करोना प्रतिबंधात्मक लसीकरणात आघाडीवर असून त्याला वेग येण्यासाठी महाराष्ट्राला दर आठवड्याला ४० लाख डोसेस देण्याची आग्रही मागणी केंद्र शासनाकडे केल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. रेमडीसीवीर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांशी चर्चा करणार असून एमआरपीचा आधार घेवून विक्रेते जास्त किंमतीने त्याची विक्री करणार नाही, यासाठी उपाययोजना करण्याची सूचना केल्याचेही त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या