Ticker

6/Breaking/ticker-posts

राज्यात करोनाच्या तिसऱ्या लाटेचाही धोका!; मुख्यमंत्र्यांची उद्योगांना स्पष्ट सूचना

 


लोकनेता न्यूज                  

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई : कोविड संसर्गाचा झपाट्याने वाढत असलेला प्रादुर्भाव पाहता सध्याच्या परिस्थितीत ऑक्सीजनची नितांत गरज आहे. याशिवाय उद्योगांनी औषधे, बेड्स सुविधा वाढविणे, चाचणी केंद्रे, लसीकरणाला वेग देणे अशी या लढाईत शक्य होईल ती सर्व मदत राज्य सरकारला करावी, असे आवाहन मुख्यमंत्री  उद्वव ठाकरे यांनी आज केले. कोविड संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचाही धोका असल्याने उद्योग-व्यावसायिकांचे नुकसान होऊ नये आणि अर्थचक्रालादेखील झळ बसू नये म्हणून आतापासूनच कोविड सुसंगत कार्यपद्धतीचे नियोजन करावे व तशा सुविधा उभाराव्यात व कार्यप्रणाली अवलंबवावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. यावर प्रतिसाद देताना कोविड विरुद्धच्या लढाईत संपूर्ण उद्योग विश्व आपल्याबरोबर आहे, असा विश्वास राज्यातील प्रमुख उद्योगपतींनी मुख्यमंत्र्यांना दिला.

राज्यात ज्याप्रमाणे आरोग्यविषयक टास्क फोर्स आहे. त्याचप्रमाणे कोविडसंदर्भात राज्य सरकारच्या समन्वयाने पुढील काळात काम करण्यासाठी उद्योगांचा एक टास्क फोर्स तातडीने निर्माण करावा, असेही निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे फिकी, सीआयआय तसेच इतर उद्योग प्रतिनिधींशी संवाद साधून राज्याला या काळात ज्या गोष्टींची गरज आहे, त्यात पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले. त्यावर राज्याची निकड लक्षात घेऊन प्राधान्याने आपापल्या परीने ऑक्सीजनची उपलब्धता तातडीने करून देण्यात येत आहे, असे उद्योगांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

 

याशिवाय विलगीकरण बेड्स सुविधा वाढविणे, चाचणी केंद्रे स्थापन करणे आणि लसीकरण वाढविणे यामध्ये उद्योग पुढाकार घेऊन लगेच कार्यवाही सुरू करतील असेही सांगण्यात आले. सर्व उद्योगपती हे राज्याच्या परिवारातले असून या संकटसमयी त्यांनी पुढे येऊन मदत करावी, असे कळकळीचे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले, कोविड संदर्भातील सुविधा उभारणे किंवा याविषयी आवश्यक त्या बाबींमध्ये राज्य शासन तातडीने मदत करेल. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी उद्योगांनी नियोजन करावे. ऑक्सीजनची राज्याला खूप गरज असून सध्या सर्व उत्पादित ऑक्सीजन वैद्यकीय कारणास्तव वापरला जात आहे. रुग्णसंख्या पाहता आणखी ऑक्सीजनची गरज भासत असून आपण पंतप्रधानांनादेखील तसे कळविले आहे. कालही संध्याकाळी त्यांना संपर्क केला होता मात्र, ते पश्चिम बंगाल निवडणुकीत व्यस्त असल्याने बोलणे होऊ शकले नाही. मात्र, केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वतोपरी सहकार्य मिळते आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.



कोविडच्या किती लाटा येतील ते आज सांगू शकत नाही मात्र राज्यातील उद्योगांनीसुद्धा येणाऱ्या लाटेला तोंड देण्याच्या दृष्टीने आवश्यक ते नियोजन आतापासूनच करावे, उदाहरणादाखल कोविड सुसंगत कार्यप्रणाली स्वीकारणे, चाचणी व लसीकरणाच्या सुविधा उभारणे, कामगार व कर्मचारी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष यंत्रणा निर्माण करणे, आपल्या परिसरात विलगीकरण व्यवस्था उभारणे तसेच बेड्स उपलब्ध ठेवणे, वर्क फ्रॉम होमची यंत्रणा विकसित करणे, कामगारांच्या कामाच्या वेळांत तसे अनुरूप बदल करणे अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. गेल्या वर्षभरात जगातील इतर देशांनी करोनाच्या काही लाटा अनुभवल्या आहेत, त्यांनी वेळोवेळी निर्बंधही लावले आहेत. ही गोष्ट सर्वांनी ध्यानात घ्यावी, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, पुढेदेखील या 
लॉकडाउन  किंवा निर्बंधांमुळे उद्योगांना झळ सोसावी लागू नये, अशी काळजी आपण घेतली पाहिजे.



राज्य सरकार या कोविड काळात गरीब व दुर्बल घटकांसाठी मदतीचा हात देत आहे. शिवभोजन थाळी ही अनेक गरिबांचे पोट भरते. आपल्या सीएसआरच्या माध्यमातून असे काही उपक्रम आपल्या उद्योगांच्या परिसरातील वसाहती व गावांसाठी राबविले तर सामाजिक उत्तरदायित्व निभावले जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी टास्क फोर्सचे डॉक्टर शशांक जोशी यांनीदेखील या संसर्गाच्या वाढत्या प्रभावाविषयी माहिती दिली. बैठकीत सर्व उद्योगपतींच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात जेएसडब्ल्यू , महिंद्र, गोदरेज, बजाज, रिलायन्स, टाटा, ब्ल्यू स्टार,एल एंड टी , इन्फोसिस, कायनेटिक इंजिनिअरिंग यांच्या प्रतिनिधींनी बोलताना विशेषत: ऑक्सीजन उपलब्धता करून देण्यात येईल तसेच अन्य सुविधांसाठी तातडीने पावले उचल आहोत असे आश्वासन दिले. 


अनेक उद्योगांनी त्यांच्या परिसरात विलगीकरण सुविधा उभारत असल्याचेही सांगितले. बैठकीस उदय कोटक, निरंजन हिरानंदानी, दीपक मुखी, हर्ष गोयंका, सलील पारेख, नील रहेजा, संजीव बजाज, अनंत गोयंका, बाबा कल्याणी, बी त्यागराजन, अनंत सिंघानिया, बनमाली अग्रवाल, अश्विन यार्दी, एस. एन सुब्रमनियन, सुनील माथुर, संजीव सिंग, नौशाद फोर्बस, सुलज्जा फिरोदिया, समीर सोमय्या, आशिष अग्रवाल आदी उद्योगपती उपस्थित होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील आपल्या सूचना मांडल्या तसेच उद्योगपतींना कोविडविषयक सुविधा उभारण्यात कुठलीही अडचण येऊ देणार नाही असे सांगितले. राज्य शासनाकडून मुख्य सचिव सीताराम कुंटे, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंह, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, प्रधान सचिव सौरव विजय, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी पी अनबलगन आदींची उपस्थिती होती.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या