Ticker

6/Breaking/ticker-posts

नगरच्या सायकलस्वारांची माऊंट एव्हरेस्टला ‘गवसणी’

 



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर: अहमदनगरमधील चार सायकलस्वारांनी माऊंट एव्हरेस्टच्या उंची इतकी सायकल चालवून माऊंट एव्हरेस्टला गवसणी घातली. त्यामुळे त्यांचे नाव   हॉल ऑफ फेम  मध्ये नोंदविले गेले आहे. सायकलिस्ट शरद काळे पाटील, सागर काळे ,शशिकांत आवारे, उदय टीमकरे, यांनी हा मान मिळवला आहे.

जगातील सर्वात अवघड आव्हान या पाच सायकलस्वारांनी स्वीकारले होते. शनिवारी २७ मार्चला ते पूर्ण केले. सुयोग मोकाटे यांना काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे राईड पूर्ण करता आली नाही. माउंट एव्हरेस्टची उंची ८८४८ मीटर (२९०२९ फूट) आहे. सायकलस्वाराने हे अंतर एखादया टेकडी अथवा डोंगरावर वरखाली करून तितकी उंची गाठायची असते. हे पूर्ण केल्यास त्याचे नाव हॉल ऑफ फेममध्ये नोंदविले जाते.
पाचही सायकल स्वरांनी शनिवारी सकाळी ६ वाजता पांढरीपूल येथील हनुमान मंदिरापासून सुरुवात केली होती. ७५ वेळा इमामपूर घाटातून सायकलवरवर चढउतार केली. घाट्याच्या पायथ्यापासून उंची १२५ मीटर आहे. हे अंतर कापण्यास काळे पाटील यांना ३७ तास ५८ मिनिटे लागली. तर सागर काळे यांना ३८ तास व उदय टिमकीरे यंना ३८ तास २९ मिनिटे लागली. विशेष म्हणजे सायकल स्वाराने मध्ये कुठेही झोप घेता कामा नये अशी अट घातली गेली होती. रात्रीच्या वेळी सायकल चालविताना घाटामध्ये चोरांचाही धोका होता. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी युवराज आठरे यांनी बंदोबस्त पुरविल्याने धोका मोहीम सुरक्षित पार पडली.

आजपर्यंत जगातील १५८३४ स्पर्धकांनी हे चॅलेंज पूर्ण केले आहे. भारतातील फक्त १५२ स्पर्धकांनी हे चॅलेंज पूर्ण केले आहे. त्यात १३५ पुरुष तर १७ महिला आहेत. दोन महिन्यापूर्वी पुण्यामध्ये ६०० कि.मी. ची बी.आर.एम करत असताना एवरेस्ट्टीगबद्दल सायकलिस्ट श्रीमती कांचन बोकील यांच्याकडून माहिती मिळाली. काळे पाटील गेल्या दोन वर्षांपासून सह्याद्री क्लासिक ह्या महाराष्ट्रातील सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या सायकलिंग स्पर्धेत भाग घेऊन वेळेत पूर्ण केली होती. तीन वर्षांपासून काळे पाटील सायकलिंग मधील सुपर रेंडूनियर (एसआर) आहेत. त्यांनीच इतर चार सायकल स्वारांना या मोहिमेबद्दल सांगून त्यांना भाग घेण्यास प्रवृत्त केले. विशेष म्हणजे हे चारही सायकलस्वार अकरावी व बारावी या वर्गात शिकत असून त्यांनी नुकतीच सायकलिंगला सुरवात केली आहे.


या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी अनेकांनी सायकल, मोटार सायकल किंवा चारचाकी वाहने घेऊन सायकलस्वारांसोबत काही अंतर प्रवास केला. या काळात सायकलस्वरांना चहा, बिस्कीट, चिक्की, चॉकलेट, फळे, काजू, बदाम, खजूर, ताक व लस्सी अशा स्वरूपात अनेकांनी भेटवस्तू दिल्या. ग्रामीण भागातील या चार सायकलपटूंनी केलेली कामगिरी अभिमानास्पद आहे. 
अहमदनगर सायकलिस्टसाठी ही एक भूषणावह गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया नगर सायकलिस्ट असोसिएशनचे ज्येष्ठ सदस्य चंद्रशेखर मुळे यंनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या