Ticker

6/Breaking/ticker-posts

दहावी, बारावी परीक्षा नियोजित वेळेनुसारच, अफवांवर विश्वास नको: बोर्ड

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

पुणे- : राज्यातील दहावी, बारावी परीक्षांचे आयोजन नियोजित वेळेनुसारच होणार आहे. येत्या दोन दिवसात प्रात्यक्षिक परीक्षांबाबतच्या मार्गदर्शन सूचना मंडळातर्फे जारी करण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केले आहे.

मंडळाने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, 'राज्यातील करोना संक्रमणाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारवीच्या परीक्षा सुरक्षित व सुरळीतपणे तसेच नियोजित कालावधीत पार पाडण्याच्या दृष्टीने मंडळ स्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, विविध समाज माध्यम, प्रसार माध्यमाद्वारे दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात विविध बातम्या आणि अफवा प्रसारित होत आहेत. त्यामुळे परीक्षेशी संबंधित घटकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. मंडळामार्फत अशा सर्व संबंधित घटकांना आवाहन करण्यात येते की अशा कोणत्याही संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये. यासंदर्भात मंडळामार्फत संकेतस्थळावर आणि प्रसिद्धी माध्यमांद्वारे निवेदने प्रसिद्ध करण्यात येतील तसेच शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना वेळोवेळी सूचना देण्यात येतील, त्याच अधिकृत मानण्यात याव्यात.'

इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २९ मे या कालावधीत तर बारावीच्या परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत होणार आहेत. तसेच दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व तत्सम परीक्षा १२ ते २८ एप्रिल आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा ५ ते २२ एप्रिल या नियोजित कालावधीत होणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या