Ticker

6/Breaking/ticker-posts

मुळातच सरकारचा रिमोट शिवसेनेकडे नाही..-विखे पाटील


 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

शिर्डी :-मुळातच सरकारचा रिमोट शिवसेनेकडे नाही. तो कोणाकडे आहे, हे सर्वांना माहिती आहे. सरकारमध्‍ये काँग्रेस पक्षाचेच अस्तित्‍वच नाही, तर त्यांच्या मंत्र्यांचे कुठे दिसणार? पक्षाने आता इशारे देण्‍याचे काम सोडून द्यावे. एवढी लाचारी पत्‍करुन सरकारमध्‍ये राहण्‍याची वेळ आली असेल तर त्‍यांनी सरळ सत्‍तेतून बाहेर पडून आपली स्‍वत:ची ताकद दाखवून दिली पाहिजे.  अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेससह शिवसेनेव् र सडकुन टीका केली.


शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना विखे यांनी ही टीका केली. शिवजयंतीसंबंधी सरकारने जाहीर केलेली नियमावली मागे घ्यावी आणि जनतेला खुलेपणाने शिवजयंती साजरी करून द्यावी, या विषयावर विखे बोलत होते. मात्र, यावेळी त्यांनी काँग्रेसवर आणि थोरात यांच्यावरही टीका करण्याची संधी सोडली नाही. शिवजयंतीच्‍या निमि‍त्‍ताने महाविकास आघाडी सरकारने केलेले नियम हे महाराष्‍ट्राच्‍या अस्मि‍तेला धक्‍का पोहचविणारे आहेत. सरकारने फार प्रतिष्‍ठेचा विषय न करता ही नियमावली तातडीने मागे घ्‍यावी, राज्‍यातील शेतक-यांकडून दहशतीने सुरु असलेली विज बिलांची वसुली ही चीड निर्माण करणारी आहे. अलीकडेच झालेल्या एका युवतीच्या आत्‍महत्या प्रकरणात सरकार मंत्र्यांना पाठीशी घालतयं का असा प्रश्‍नही विखे यांनी उपस्थित केला. त्यावरूनच लाचारी पत्‍करुन सत्‍तेत राहण्‍यापेक्षा बाहेर पडून आपली ताकद दाखवा असा सल्‍लाही त्‍यांनी काँग्रेसला दिला.


     काँग्रेसने अनेकदा इशारे देऊनही सरकारने काहीच दखल घेतली नाही. काँग्रेसचे मागील प्रदेशाध्यक्ष सरकारबद्दल एका शब्दानेही बोलले नाहीत. आता नवीन प्रदेशाध्यक्ष काय करतात माहिती नाही,’ अशा शब्दांत विखे पाटील यांनी काँग्रेसवर त्यासोबतच त्यांचे पारंपरिक विरोधक   बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.


    शिवजयंतीवरील निर्बंधासंबंधी ते म्हणाले, ‘राज्‍यात मंत्र्यांचे दौरे मोकाटपणे सुरु आहेत, काँग्रेस प्रदेशाध्‍यक्षांच्‍या पदभार सोहळ्यालाही गर्दी झालेली चालते. शिवजयंतीसाठी मात्र सरकारने नियमावली तयार करुन एक प्रकारे राज्‍याच्‍या अस्मि‍तेलाच धक्‍का देण्‍याचे काम केले आहे. ज्‍यांच्‍या आशिर्वादाने आणि ज्‍यांचे नाव घेवून महाविकास आघाडी सरकार सत्‍तेवर आले, त्‍या आराध्‍य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या जयंतीला मात्र नियमावली तयार होते, हे महाराष्‍ट्राच्‍या दृष्‍ट्रीने अतिशय धक्‍कादायक आणि चीड आणणारी बाब आहे. सरकारने तात्‍काळ ही नियमावली मागे घेवून राज्‍यातील जनतेला शिवजयंती साजरी करु द्यावी.असेही ते म्हणाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या