Ticker

6/Breaking/ticker-posts

शिर्डीतील पत्रकारांवर साईबाबा संस्थानची सूड भावनेतून कारवाई; चौकशीची मागणी

 



मुख्यमंत्री ठाकरे व पाणीपुरवठा मंत्री पाटील यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून निवेदन

लोकनेता न्यूज 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क

मुंबई :- कोविड नियमांना अधीन राहून भाविकांसाठी खुले करण्यात आलेल्या श्री साईबाबा समाधी मंदिरातील अव्यवस्था व मनमानी कारभाराचे वस्तुनिष्ठ वार्तांकन करणार्या पत्रकारांवर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी सूडभावनेतून गुन्हे दाखल केले आहेत. हा प्रकार लोकशाहीचा चौथास्तंभ समजल्या जाणार्या माध्यमांची मुस्कटदाबी करणारा आहे. बगाटे हे शिर्डीतील नियुक्तीपासूनच वादग्रस्त ठरले आहेत. त्यांच्या एकूण भूमिकेची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी व राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या शिर्डीतील प्रतिनिधींवर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा त्वरीत मागे घेण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे .

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांची नाशिक विभागीय कार्यकारिणीने भेट घेऊन याबाबत  निवेदन दिले .

 निवेदनात पत्रकारांवर केलेली कारवाई अत्यंत चुकीची असून तातडीने त्यांच्यावरील गुन्हे शिर्डी संस्थानच्या प्रशासनाने याबाबत एक पाऊल मागे घ्यावे, चुकीचे प्रकार महाविकास आघाडीचे सरकार कधीही खपवून घेणार नाही, पत्रकारांनी केलेली बातमी तिची सतत्या पडताळून पहावी, विनाकारण पत्रकरांवर गुन्हे दाखल करु नये, अशी मागणी राज्यपत्रकार संघाच्यावतीने करण्यात आली.

गेल्या 16 नोव्हेंबर 2020 रोजी राज्य शासनाच्या आदेशान्वये राज्यातील सर्व देवालये भाविकांसाठी खुली करण्यात आली. तब्बल आठ महिन्यांच्या विलंबानंतर मंदिरं उघडल्याने कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत मोठी गर्दी होणार हे निश्‍चित असल्याने विविध वृत्तवाहिन्यांचे व मुद्रित माध्यमाचे प्रतिनिधी मंदिरे उघडली, त्या दिवशी शिर्डीत वार्तांकन करीत असताना या पार्श्‍वभूमीवर अडीच महिन्यानंतर एका वृत्तवाहिनीच्या तिन पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात त्यांचा पूर्वग्रह दिसून येतो. 

तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषिवर कारवाई करावी अशी मागणी  संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश कार्याध्यक्ष राकेश टोळये, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, राज्य सरचिटणीस विश्‍वासराव आरोटे, प्रदेश प्रसिध्दीप्रमुख नवनाथ जाधव, मुंबई विभागीय अध्यक्ष संजय माळवदे, कोकण अध्यक्ष भगवान चंदे, पुणे विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे, विदर्भ अध्यक्ष महेश पानसे, बाळासाहेब देशमुख, नाशिक विभागीय अध्यक्ष प्रविण सपकाळे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, कोकण विभागीय संपर्क प्रमुख नितीन शिंदे आदींनी  केली आहे. 

या बाबत ना . पाटील यांनी ,लवकरच राज्याच्या कॅबिनेट बैठकीत हा विषय मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे मांडून तडीस लावला जाईल , असे आश्वासन दिले .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या