Ticker

6/Breaking/ticker-posts

महाराष्ट्रात लॉकडाऊन? वाढत्या कोरोनावर मुख्यमंत्र्यांचे 6 मोठे निर्णय

 

लोकनेता न्यूज

ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन काही सूचना केल्यात. कोविडविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. त्यावेळी त्यांनी अनेक निर्णय घेतले आहेत.

 

उद्धव ठाकरेंच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

1. तर पोलिसांनी कडक दंडात्मक व  कारवाई करावी
लॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवायचे आहे. लोक मास्क घालत नाहीत किंवा आरोग्याचे नियम पाळत नसतील तर जिल्हा आणि पोलीस प्रशासनावर हे नियम काटेकोरपणे अंमलात आणण्याची जबाबदारी आहे, त्यांनी अजिबात शिथिलता न दाखवता कडक दंडात्मक व आवश्यक कारवाई केलीच पाहिजे.

 


 2. कोरोना संसर्ग  परिसरात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करा

कोरोनाचा संसर्ग वाढत असेल त्या भागात किंवा परिसरात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करा, एकेका रुग्णांचे किमान 20 तरी संपर्क शोधलेच पाहिजेत.सर्व काही व्यवहार सुरू झाले आहेत, निर्बंध शिथिल केले आहेत, त्यामुळे तरुण वर्ग घराबाहेर पडला आहे, त्यात जणू काही कोरोना संपला असे सगळे वागत आहेत, परिणामतः आपल्याच घरातील वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांना आपण धोक्यात आणतो आहोत. मधल्या काळात आपण माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबवून राज्याचा आरोग्य नकाशा तयार केला. यातील सह व्याधी रुग्णांची परत आरोग्य कर्मचाऱ्यांनी विचारपूस सुरू करा.

 

3. त्या संघटनांशी बोलून मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करा
ज्या ज्या व्यावसायिक संस्था, संघटना लॉकडाऊन उठविण्यासाठी आपणाकडे येत होत्या, त्या सर्व संबंधित संस्था, संघटना यांच्याशी परत एकदा बोलून एसओपीची काटेकोर अंमलबजावणी होईल याची खात्री करून घ्या. जिथे कंटेनमेंट आवश्यक आहे तिथे ते करा व त्याची अंमलबजावणी करा.

 

4. स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी तात्काळ कारवाई करावी
गेले वर्षभर आपण कोरोनाशी लढतांना विविध क्षेत्रांसाठी नियम ठरविली आहे, मात्र त्याची अंमलबजावणी होतांना दिसत नाही हे गंभीर आहे. विशेषतः इतके दिवस थांबलेले लग्न समारंभ सुरू झाले आहेत, लोकांच्या गाठीभेटी, पार्ट्या व इतर सामाजिक कार्यक्रम कुठल्याही आरोग्याच्या नियमविना होतांना दिसतात. उपाहारगृह, हॉटेल्सच्या वेळा आपण वाढविल्या आहेत मात्र नियमांचे पालन होतांना दिसत नाही. स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी अशा सर्व ठिकाणी भेटी देऊन तत्काळ कारवाई केली पाहिजे.

 

5. त्या हॉल्स किंवा सभागृहांवर परवाने रद्द करा
ज्या विवाह किंवा इतर समारंभात मास्क व इतर नियम पाळलेले दिसणार नाहीत त्या हॉल्स किंवा सभागृहांवर परवाने रद्द करण्याची कडक कारवाई प्रसंगी केली पाहिजे. लोकांमध्ये बेफिकिरी आली असली तरी स्थानिक प्रशासन व पोलिसांत कर्तव्यात ढिलाई नको.

 

6. गावागावात जाऊन लोकांच्या चाचण्या वाढवा
हॉटेल्स, उपाहारगृहे यांना वेळा वाढवून दिल्या आहेत, मात्र नियम पाळत नसतील तर लगेच कडक कारवाई करा. सार्वजनिक ठिकाणी पालिकांनी जंतुनाशक फवारणी नियमित करणे सुरू करावी. गावागावात जाऊन फिरत्या वाहनाद्वारे लोकांच्या चाचण्या वाढवा. ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या फिल्ड हॉस्पिटलमधील सर्व यंत्रणा व्यवस्थित सुरू आहेत का याची खात्री करा, ही सुविधा वापरण्याची वेळ येऊ नये पण तयारीत राहा, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या