Ticker

6/Breaking/ticker-posts

फडणवीसांची मनधरणी निष्फळ ! अण्णा उपोषणावर ठाम

 


आता चर्चा, आश्वासने नकोत, ठोस निर्णय घ्या- हजारे

 पारनेर : - माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राळेगणसिद्धी येऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची सुमारे एक तास मनधरणी केली. मात्र हजारे यांचे समाधान झाले नाही.आता चर्चा, आश्वासने नकोत तर ठोस निर्णय घ्या असे सांगत हजारे आपल्या उपोषणाच्या निर्णयावर ठाम राहिले.

त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते हरीभाऊ बगाडे, खासदार भागवत कराड,माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,माजी मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे यांच्यापाठोपाठ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेली हजारे यांची मनधरणी निष्फळ ठरली.चर्चेच्यावेळी महाजन,विखे यांच्यासह शिरूरचे (पुणे) माजी आमदार बाबूराव पाचार्णे उपस्थित होते.

           स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारीत दीडपट हमीभाव मिळावा, दूध, भाजीपाला,फळे यांच्या किमान आधारभूत किमती निश्चीत कराव्यात, केंद्रीय व राज्य कृषी मूल्य आयोगांना निवडणूक आयोगाप्रमाणे स्वयत्तता द्यावी या शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी हजारे ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धीत उपोषण करणार आहेत.या पार्श्र्वभूमीवर फडणवीस यांनी हजारे यांची भेट घेतली.

            भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना हजारे म्हणाले की, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे पत्र घेऊन माजी मुख्यमंत्री फडणवीस आले होते.मात्र पत्रात ठोस काहीही नाही त्यामुळे आपण उपोषणाच्या निर्णयावर ठाम असल्याचे हजारे यांनी स्पष्ट केले.

            बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, हजारे यांच्या मागण्या समजावून घेतल्या आहेत.त्यांच्या काही मागण्यांसंदर्भात केंद्र सरकारने यापूर्वीच सकारात्मक निर्णय घेतले आहेत.त्याबाबत हजारे यांचे नेमके काय म्हणणे आहे तेही समजून घेतले आहे.आता केंद्रीय कृषिमंत्री , पंतप्रधान कार्यालयाशी चर्चा करून,त्यांच्यापर्यंत हजारे यांचे म्हणणे पोहचवून हजारे यांच्या मागण्या मान्य करुन घेण्यात येतील.असे फडणवीस यांनी सांगितले.

            कृषी मंत्रालय, पंतप्रधान कार्यालयाला हजारे यांनी तब्बल २३ पत्रे पाठवली मात्र एकाही पत्राचे उत्तर देण्यात आले नाही या हजारे यांच्या आक्षेपाविषयी विचारले असता फडणवीस म्हणाले की, यासंदर्भातील आपली कृषीमंत्र्यांशी चर्चा झाली.हजारे यांच्या पत्रांना थातूरमातूर उत्तर देणे,आपले पत्र मिळाले, कारवाईसाठी असे त्रोटक उत्तर देणे योग्य नाही.हजारे यांच्या पत्रातील मागण्यांसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेऊनच त्यांना उत्तर देणे अपेक्षित असते.त्यामुळे हजारे यांच्या काही पत्रांना उत्तरे देता आली नाहीत.त्यामुळे गैरसमज झाले अशी सारवासारव हजारे यांनी केली.


आजच्या चर्चेतून हजारे यांचे समाधान झाले नसले तरी ही सुरूवात आहे. हजारे यांच्याशी सातत्याने संपर्कात राहून
,त्यांच्याशी चर्चा करून त्यांना उपोषणापासून परावृत्त करु असा विश्र्वास फडणवीस यांनी व्यक्त  केला.अण्णा हजारे हे केवळ एक व्यक्ती नसून ती एक चळवळ आहे,ते राज्याचे नव्हे तर देशाचे भूषण आहेत.त्यांनी या वयात उपोषणाचा मार्ग अवलंबू नये अशी प्रत्येकाची इच्छा आहे असे फडणवीस म्हणाले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या