Ticker

6/Breaking/ticker-posts

भविष्यकालीन पाणीटंचाई : भूजल व्यवस्थापन व पिक नियोजनाशिवाय पर्याय नाही - पवार

 


नगर
 :- आज देशातील १५ राज्यात भीषण पाणीटंचाई असून ५२ टक्के भूभाग हा अवर्षणप्रवण क्षेत्रात आहे.विहिरीद्वारे होणारे सिंचन हे वरच्या भूस्तरातून होते.आपण आता खोलवरच्या भूस्तरातून(बोअरवेलद्वारे) पाणी उपसा करत असून परिणामी  दरवर्षी ३० ते ४० हजार बोअरवेल कोरडे पडत आहेत तर भविष्यकाळात वाळवंटीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. देशासमोरील भविष्यकालीन पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी भूजल व्यवस्थापन व पिक नियोजनाची अत्यंत गरज आहे, असे ठाम मत राज्याच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपट राव पवार यांनी व्यक्त केले .

            लोकसभेचे सभापती यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कार्यक्रमानिमित्त गतवर्षी पदम पुरस्कार जाहीर झालेल्या व्यक्तींचे मार्गदर्शन देशातील खासदारांना देण्यात आले. सदर ऑनलाईन कार्यशाळेत दिनांक २२ जानेवारी २०२१ रोजी पद्मश्री पोपटराव पवार यांनी देशातील खासदारांना ग्रामविकासावर मार्गदर्शन केले.त्यावेळी पवार पुढे बोलताना म्हणाले, सर्वात सुपीक असा भूभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंजाबच्या मातीने भारताची भूक भागविली तिथेसुध्दा ३०० ते ४०० फुट खोलवर गेल्याशिवाय पाणी मिळत नाही.त्याचबरोबर राजस्थान,गुजरात ,तेलंगणा,तामिळनाडू,ओरिसा या भागातसुद्धा तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.त्यामुळे भविष्यकाळात देशासमोर पाणीटंचाईचे सर्वात मोठे आव्हान येत आहे.

म्हणून हिवरे बाजारच्या प्रयोगातून भूजल व्यवस्थापन व पिक नियोजनातून हिरवेगार,पाणीदार,निर्व्यसनी गाव निर्माण झालेले आपल्याला पहायला मिळत आहे. समृद्धीच्या मागे चंगळवाद व व्यसनाधीनता येऊ नये यासाठी तरुणाईला संस्कारक्षम बनविण्याची विशेष  गरज आहे अन्यथा व्यसनाधीन कुटुंब व व्यसनाधीन गावे राष्ट्रासमोर सर्वात मोठे आव्हान असेल.संस्कार देण्याची शिक्षणव्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे.भारतीय संस्कृतीतील संतसाहित्य अभ्यासक्रमात व आचरणात येणे गरजेचे आहे.आर्थिक क्षमत नसलेल्या घटकांसाठी सरकारी व्यस्था आहे परंतु ती व्यवस्था सक्षम करण्याची गरज आहे अन्यथा खाजगीकरणातून नवी विषमता निर्माण होईल.

महाराष्ट्रीतील संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान ,तंटामुक्त अभियान,पाणी फाउंडेशन मार्फत होणारी कामे ,जलयुक्त शिवार योजनेतून होणारी कामे ,रोजगार हमी योजनेतून होणारी कामे याविषयी सविस्तर माहिती  पवार यांनी दिली.भारतीय संस्कृतीत पंचमहाभूतांची दिलेली जोड सिंहस्थाच्या रूपाने जलपरंपरा महत्वाची आहे.

स्थानिक समस्यांच्या आधारे नियोजनाची गरज आहे.एका छोटयाशा गावाचा सरपंच खासदारांना मार्गदर्शन करू शकतो एवढी मोठी संधी प्रत्येक गावात काम करणाऱ्या कार्य्कार्त्यासाठी आहे.त्यासाठी स्थानिकांचा सहभाग प्रशासनाचे पाठबळ व त्यातून बलशाली भारताचे स्वप्न साकार होऊ शकते असेही .पवार यांनी सांगिलते. 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या