Ticker

6/Breaking/ticker-posts

राजू शेट्टी यांच्याकडे राज्याचे लक्ष; आज जलसमाधी घेण्यावर ठाम !

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

कोल्हापूर: चार दिवसांपासून शेतकरी आक्रोश करत आहेत. परिक्रमाच्या माध्यमातून ते आपला आक्रोश व्यक्त करत असतानाही सरकार त्याची दखल घेत नाही. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांसोबत मी जलसमाधी घेणारच असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. केंद्र आणि राज्य सरकारला सत्तेची धुंदी चढली आहे, ही धुंदी शेतकरीच उतरवतील, असेही ते म्हणाले.

जुलै महिन्यात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात महापूर आला होता. या घटनेला सव्वा महिना उलटला तरी अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. नुकसान भरपाईबाबत सरकारी आदेश काढण्यात आला नाही. या पार्श्वभूमीवर २०१९ च्या महापुरावेळी घेतलेल्या शासन निर्णयानुसार मदत मिळावी यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी संघटनेने पंचगंगा परीक्रमा सुरू केली आहे. प्रयाग चिखली येथून चार दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या आंदोलनाला स्थानिक नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. गावोगावी प्रचंड संख्येने शेतकरी या आंदोलनात सहभागी होत आहेत.

आंदोलन सुरू होवून चार दिवस झाले तरीही सरकारने साधी चौकशी केली नाही, चर्चा केली नाही, असा आरोप करून शेट्टी म्हणाले, पूराला सव्वा महिना उलटला. नुकसान भरपाई मिळावी म्हणून पूरग्रस्त आक्रोश करत आहेत. चार दिवसांपासून आमचे आंदोलन सुरू आहे. पण चार दिवस मंत्री राहूदे, साध्या तलाठ्यानेही चौकशी केली नाही. आमदार, खासदार, मंत्री, जिल्हाधिकारी या सर्वांनीच या आंदोलनाची दखल घेतली नाही. सरकारने मदतीबाबत निर्णय न घेतल्यास रविवारी जलसमाधी घेण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. सरकारला इतर सर्व खर्चासाठी पैसे आहेत, मग शेतकऱ्यांना देण्यास हात आखडता का घेतला जात आहे, असा सवालही त्यांनी केला आहे. सरकारला सत्तेची धुंदी चढली आहे, त्यामुळे या धुंदीत त्यांना पूरग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकू येत नसल्याचा आरोप करून ते म्हणाले, ही परिस्थिती अशीच राहिल्यास एक दिवस हा आक्रोश एवढा वाढेल की ज्यामुळे सरकारचे कानही फाटतील.

दरम्यान, यात्रा सुरू असतानाच शेट्टी यांचे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतून नाव वगळल्याचे वृत आले. याबाबत विचारले असता त्यांनी हा काय आमच्या जीवन मरणाचा प्रश्न नाही. सध्या पूरग्रस्तांच्या मागण्या मान्य करून घेणे एवढेच आमचे ध्येय आहे. जर कुणी माझा करेक्ट कार्यक्रम केला असेल तर त्या पलिकडेही एक करेक्ट कार्यक्रम असतो, तो मी केल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते  शरद पवार ,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शेट्टी यांचे नाव वगळले नसल्याचे स्पष्ट केल्याने दोन दिवस सुरू असलेले हे वादळ पेल्यातीलच ठरण्याची चिन्हे आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या