Ticker

6/Breaking/ticker-posts

आमदार संजय राठोड पुन्हा अड्चणीत; राठोड यांनी फेटाळले आरोप

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

यवतमाळ: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले शिवसेना नेते आमदार संजय राठोड हे एका महिलेने पोलिसांना पोस्टाद्वारे पाठविलेल्या कथित आरोपपत्रामुळे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. या आरोपांवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असताना संजय राठोड यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. विरोधक आणि हितशत्रूंकडून आपले राजकीय जीवन संपविण्यासाठी कथित आरोपांची सुपारीदिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत राठोड आज बोलत होते. एका महिलेने घाटंजी पोलिसांना पोस्टाद्वारे पाठविलेल्या पत्राबाबत माध्यमांमधून कळले. काही राजकीय व्यक्ती व माध्यमांनी कोणतीही खातरजमा न करता कथित पत्राच्या आधारे आपल्यावर पुन्हा आरोप केल्याने आपण व्यथित झालो आहोत, असे राठोड म्हणाले. या प्रकरणास संस्थांतर्गत वाद असल्याचे त्यांनी सांगितले.

आपण पूर्वी पदाधिकारी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कला, शिक्षण व ग्रामीण विकास प्रतिष्ठाण या संस्थेंतर्गत कळंब तालुक्यातील शिवपुरी येथे चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळेतील दोन शिक्षक व एका स्वयंपाक्याला सतत गैरहजर राहत असल्याने निलंबित केले होते. या प्रकरणी निकाल संस्थेच्या बाजूने लागल्याने तिन्ही कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले व नव्याने तात्पूरती पदे भरण्यात आली. २०१७ मध्ये झालेल्या या कारवाईनंतर विलास यादव आडे या शिक्षकाने स्वत: सेवेचा राजीनामा दिला. फेब्रुवारी २०२१ मध्ये पूजा चव्हाण प्रकरणात आरोप झाल्यानंतर या शिक्षकाने सेवेत परत घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यास सुरूवात केली, असे राठोड म्हणाले.

राठोड पुढे म्हणाले की, मात्र हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने निकाल लागल्यानंतर बघू असे त्याला समजावले. त्यानंतर माझा मोबाईल क्रमांक समजून आश्रमशाळेचे मुख्याध्यापक संजय जयस्वाल यांना अनोळखी क्रमांकावरून धमकीचे संदेश आले. यासंदर्भात वडगाव जंगल पोलीस ठाण्यात २४ मे २०२१ रोजी तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच आपल्याला वैयक्तिक क्रमांकावर विविध पाच अनोखळी क्रमांकावरून सतत धमकीचे व राजकीय जीवनातून संपविण्याचे संदेश आले. या संदर्भात २८ जुलै रोजी अवधुतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती राठोड यांनी दिली. कोण्यातरी महिलेस हाताशी धरून हे घाणेरडे आरोप व राजकारण केले जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. मात्र आपण समाजकारणात कायम सक्रिय राहू, असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, सभापती श्रीधर मोहोड, हरिहर लिंगननवार आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या