Ticker

6/Breaking/ticker-posts

शिवसेनेची स्मार्ट खेळी! आदित्य ठाकरेंच्या खांद्यावर 'या' निवडणुकीची धुरा?

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई: मुंबईसह राज्यातील इतर महत्त्वाच्या महापालिकांतील आगामी निवडणुकांच्या निमित्तानं राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मनसेनं नाशिकची महापालिका निवडणुकीची सूत्रे अमित ठाकरे यांच्याकडं सोपवल्यानंतर आता शिवसेनेनं निवडणुकीच्या बाबतीत मोठा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईचा गड राखण्याची जबाबदारी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडं दिली जाणार असल्याची चर्चा आहे. या निमित्तानं आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व ठळकपणे पुढं आणण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.

भाजपशी असलेली युती तुटल्यानंतर आणि राज्यात शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादीची महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. राज्याच्या सत्तेतून बाहेर ढकलल्यामुळं भारतीय जनता पक्ष शिवसेनेवर कमालीचा नाराज आहे. मुंबईची सत्ता ताब्यात घेऊन शिवसेनेला उत्तर द्यायचं, अशी रणनीती भाजपनं आखली आहे. त्यासाठी पडद्यामागे सर्व प्रकारची मोर्चेबांधणी सुरू आहे. मनसेला सोबत घेण्याचाही भाजपचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीनंही वातावरण निर्मिती केली जात आहे. अशा परिस्थितीत मुंबईचा गड राखणं हे शिवसेनेपुढं आव्हान असणार आहे.


शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडं मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी असल्यानं साहजिकच निवडणुकीचं व्यवस्थापन, रणनीती, उमेदवार निवड व प्रचाराच्या बाबतीत त्यांच्यावर मर्यादा येणार आहेत. त्यामुळं या सर्व जबाबदाऱ्यांसाठी आदित्य ठाकरे यांचं नाव पुढं आलं आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडं पर्यावरण व पर्यटन खातं असून ते मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी मुंबईतील अनेक विकासकामांमध्ये लक्ष घालणं सुरू केलं आहे. मिठी नदी प्रकल्प, बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, मुंबई महापालिकेच्या शाळांचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न असो, आदित्य ठाकरे हे स्वत: ही कामे करून घेत आहेत. नगरसेवकांच्या कामाचा आढावा घेत आहेत. त्यामुळं महापालिका निवडणुकीची सूत्रे त्यांच्यात हाती असतील हे जवळपास स्पष्ट झालं आहे.

 

युवा सेनेचे प्रमुख म्हणून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं विद्यापीठ व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका लढल्या आहेत. त्यात अनेक ठिकाणी शिवसेनेनं चमकदार कामगिरी केली आहे. आदित्य ठाकरे यांच्यामुळं गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेत अनेक युवा चेहरे सक्रिय झालेले आहेत. महापालिका निवडणुकीत त्याचा फायदा पक्षाला होण्याची शक्यता आहे. त्यामुळंच आदित्य ठाकरे यांच्याकडं महापालिका निवडणुकीची धुरा आल्यास भाजपसारख्या बलाढ्य पक्षाला ते कशी टक्कर देतात व महापालिकेत शिवसेनेकडून किती नव्या चेहऱ्यांना संधी देतात, याबद्दल उत्सुकता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या