Ticker

6/Breaking/ticker-posts

केंद्रातील भाजप सरकारमुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेल्याचा माळींचा आरोप

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अ.नगर: केंद्रातील भाजप सरकारमुळेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर गदा आली आहे. ओबीसीला त्यामुळे मोठा फटका बसला असून ओबीसींना राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रातून एक लाख ओबीसी कार्यकर्ते दिल्लीला जाणार असून जंतरमंतर मैदानावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाणार  असल्याची माहीती, काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी दिली आहे. 

 कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी भानुदास माळी नगर येथे आले होते. यावेळी शहर जिल्हा काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, खलील सय्यद, अनंत गारदे, अनिस चुडीवाला, प्रवीण गीते, अजय मिसाळ, गणेश आपरे, कौसर खान, जरीना पठाण, मंगल भुजबळ, रिजवाना पटेल, सुमन कालापहाड आदी उपस्थित होते. 

 

पत्रकार परिषदेत बोलताना भानुदास माळी म्हणाले की, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाने ओबीसींच्या संख्येचा इम्पेरिकल डाटा मागितला होता. मात्र केंद्र सरकारने जाणीवपूर्वक तो सुप्रीम कोर्टामध्ये सादर केला नाही. यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. ओबीसीवर झालेल्या या अन्यायास सर्वस्वी भारतीय जनता पार्टी आणि केंद्रातील मोदी सरकार जबाबदार आहे. 

 या देशातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशात विकृत विचारधारा चालवत असून घाणेरडे राजकारण करत आहे. आरएसएसचा केंद्र सरकारच्या आडून देशातील आरक्षण संपवण्याचा डाव आहे. यामुळे ओबीसींसह इतर आरक्षित असणारे सर्व घटक हे संतप्त झाले आहेत. याचाच उद्रेक होऊन दिल्लीमध्ये नाईलाजास्तव न्याय्य हक्कांच्या मागण्यांसाठी जंतर-मंतरवर मोर्चा काढण्याची काँग्रेसची भूमिका आहे.

 माळी पुढे म्हणाले की, बारा बलुतेदार, आलुतेदार यांना देखील ओबीसीच्या माध्यमातून संघटीत करण्याचे काम आम्ही करीत आहोत. मी सध्या राज्यभर संवाद यात्रा काढली असून या माध्यमातून ओबीसींच्या गेलेल्या राजकीय आरक्षणाबाबत महाराष्ट्रभर जागृती करण्याचे काम आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून करीत आहोत. आतापर्यंत २४ जिल्ह्यांचा दौरा पूर्ण झाला असून ओबीसींचे संघटन मजबूत करण्याचे काम राज्यभर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमचे सुरु आहे. 

 ओबीसी हा काँग्रेसचा मूळ पाया राहिलेला आहे. मात्र मधल्या काळात हा वर्ग आमच्यापासून काही कारणास्तव दुरावला गेला आहे. त्यांना पुन्हा एकदा संघटित करत ओबीसींचे प्रश्न सोडवत काँग्रेसला मजबूत करण्याचे काम आम्ही करीत आहोत. या माध्यमातून ओबीसीतील सर्व समाज घटकांना मुख्य राजकीय प्रवाहात आणण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याचे यावेळी माळी म्हणाले.

 माळी पुढे म्हणाले की, स्वतंत्र निवडणुका लढविण्याचा प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांचा आदेश आहे. यासाठी पक्ष संघटन मजबूत करत निवडणुका आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी करीत आहोत. महाविकास आघाडी सरकारमध्ये विधिमंडळ पक्षनेते, महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात उत्तमपणे काम करीत आहे. 

 आगामी मुख्यमंत्री काँग्रेसचा व्हावा अशी महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यासाठी संघटन मजबूत करून निवडणुका स्वबळावर लढत जिंकण्याचा काँग्रेसचा निर्धार आहे. काँग्रेस ओबीसी आरक्षणा बरोबरच मुस्लिम आरक्षण तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील गंभीर आहे, असे यावेळी माळी म्हणाले.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या