Ticker

6/Breaking/ticker-posts

रत्नागिरीला रेड अलर्ट; 'या' जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 मुंबई: देशभरात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यानंतर या आठवड्यामध्ये कोकणामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अनुभव येण्याची शक्यता आहे. रत्नागिरीमध्ये सोमवारसाठी 'रेड अॅलर्ट' जाहीर करण्यात आला असून या काळात तुरळक ठिकाणी २० सेंटीमीटरहून जास्त पावसाचा अंदाज आहे. मुंबईसह, पालघर, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये गुरुवारपर्यंत ऑरेंज अॅलर्ट कायम आहे. रत्नागिरीमध्येही मंगळवार ते गुरुवार या कालावधीमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर, सातारा येथे घाट परिसरात सोमवारपासून तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल. पुणे जिल्ह्यामध्ये घाट परिसरात बुधवारी आणि गुरुवारी तीव्र मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि मध्य भारतावर निर्माण झालेले पूर्व-पश्चिम वाऱ्याचे क्षेत्र यामुळे कोकणात सर्व जिल्ह्यांमध्ये आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. नैऋत्य मोसमी वारे मराठवाड्यावरही सक्रिय आहेत. त्यामुळे मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये या आठवड्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर येथे हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. या भागामध्ये फारसा पाऊस नसेल, असा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यातही सोमवार आणि मंगळवारी पावसाचे प्रमाण काहीसे नियंत्रणात असू शकेल. सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्येही फारसा पाऊस नसेल. 

औरंगाबादमध्ये गुरुवारी, जालन्यामध्ये बुधवार-गुरुवारी, तर परभणी, हिंगोली, नांदेडमध्ये सोमवार ते बुधवार या कालावधीत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल. लातूरमध्येही सोमवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. एखाद-दुसऱ्या जिल्ह्यात गुरुवारपर्यंत मंगळवार-बुधवारी तुरळक ठिकाणी पावसाचा वेग थोडा वाढू शकेल. मात्र उर्वरित जिल्ह्यांमध्ये इतर दिवशी हलक्या ते मध्यम सरी पडतील, असे प्रादेशिक हवामान विभागाने सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या