Ticker

6/Breaking/ticker-posts

नगरच्या औद्योगिक विकासासाठी उद्योजकांना बळ देऊ -ना. थोरात


महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन


अहमदनगर;:देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचे महत्वाचे काम उद्योग क्षेत्र करीत असते. त्यामुळे उद्योगाला बळ देणे हे प्रत्येक राज्यकर्त्यांचे आणि प्रशासनाचे कर्तव्यच असते. असे सांगून नगर शहराच्या औद्योगिक विकासासाठी येथील उद्योजकांना बळ देऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करू, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले .

अहमदनगरच्या एमआयडीसीतील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज तसेच आमी संघटनेचे लघु व मोठ्या उद्योजकांसोबत त्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ.सुधीर तांबे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मनपा आयुक्त शंकर गोरे, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अरविंद पारगावकर, उपाध्यक्ष प्रकाश गांधी, किरण काळे, आमी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया, मनोज गुंदेचा, खलील सय्यद, अनंतराव गारदे, अनिस चुडीवाला, प्रवीण गीते पाटील, मच्छिंद्र साळुंखे आदींसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी उद्योजकांनी त्यांना येणाऱ्या अडचणी महसूलमंत्री  थोरात यांच्यासमोर मांडल्या. ग्रामपंचायत आणि एमआयडीसी या दोन्ही यंत्रणा एकच असतांना  कर मात्र दुहेरी आकारणे, पाण्याची पाईपलाईन जुनी झाल्याने ती सतत फुटते. नगर-मनमाड रस्त्याच्या विस्तारीकरणाची गरज, एमआयडीसी परिसरामध्ये असणारे ट्रक टर्मिनल मंजूर करण्याची मागणी आदींबाबत उद्योजकांनी ना . थोरात यांच्याकडे आपले गाऱ्हाने मांडले .

औद्योगिकरण होत असताना उद्योग अधिक चांगल्या प्रकारे चालावे यासाठी त्यांना योग्य वातावरण व सुविधा देणे आवश्यक आहे. उद्योजकांनी केलेल्या काही मागण्या या राज्य स्तरावरील आहेत. त्यामुळे याबाबत निश्चितपणे राज्य स्तरावर पाठपुरावा केला जाईल. स्थानिक उद्योजक, येथील संघटना यांना सोबत घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करु. तसेच प्रत्येक प्रश्नासाठी ज्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करून त्या मार्गी लावू, असे ना . थोरात यांनी अद्योजकांना आश्वासित केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या