Ticker

6/Breaking/ticker-posts

अहमदनगरमध्ये करोनाचा धोका वाढला; 'त्या' भागात १० दिवसांचा कडक लॉकडाऊन..

 

*पारनेर आणि संगमनेर,शेवगाव  तालुक्यात स्थिती गंभीर.

*हॉटस्पॉट बनलेल्या गावांमध्ये १० दिवस लॉकडाऊन.








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नगर: गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात कोविड रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे आता प्रशासनाने कडक उपाय योजना सुरू केल्या आहेत. करोना संसर्गाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पारनेर तालुक्यातील ४३ गावांत तर संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटातील गावांत ३१ जुलै ते १० ऑगस्टपर्यंत कडक लॉकडाउन लावण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

अहमदनगर जिल्ह्यात बुधवारी करोनाचे १ हजार २२४ नवे रुग्ण आढळून आले. आज किंचित घट होऊन ९२० रुग्ण नोंदले गेले. उपचाराधीन रुग्णांची संख्या आता साडेपाच हजारांवर पोहचली आहे. त्यामुळे पुन्हा आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ लागला आहे. पारनेर, संगमनेर, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा, जामखेड या तालुक्यांत रुग्णांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यापैकी पारनेर आणि संगमनेर हे हॉटस्पॉट ठरले आहेत. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आढावा बैठक घेऊन तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचना कालच दिल्या आहेत. परिस्थिती सुधारली नाही तर पुन्हा निर्बंध कडक केले जातील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी या भागाचा दौरा सुरू केला आहे. आज त्यांनी पारनेर आणि संगमनेरला भेटी दिल्या. तेथील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी करोनाचे जास्त रुग्ण आढळून आलेल्या साकूर भागात दहा दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पारनेर तालुक्यात भेट दिली. या तालुक्यात दुसऱ्या लाटेपासून रुग्णसंख्या जास्त असून ती नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे मधल्या काळात काही उपायही करण्यात आले. त्याचा फारसा फरक पडलेला नाही. आता या तालुक्यात करोना रुग्णसंख्या जास्त असलेल्या ४३ गावांत ३१ जुलै ते १० ऑगस्ट या काळात कडक लॉकडाऊन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या काळात फक्त औषध दुकाने आणि दवाखाने सोडता बाकी सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व तसहसीलदारांना आपापल्या भागात गरजेनुसार कडक उपाय योजना करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

रुग्णसंख्या वाढीची कारणे

* कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन होत नसल्याने रुग्ण वाढत असल्याचे आढळून आले आहे.
*सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून फिरणारे करोना पसरवणारे सुपर स्प्रेडर ठरत आहेत.
* ग्रामपंचायती, नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत असल्याचे चित्र.
* सार्वजनिक समारंभ, लग्न सोहळे या कार्यक्रमांत नियमांची पायमल्ली होत आहे.

उपाययोजना

*हिवरे बाजार पॅटर्न अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या समित्यांची जबाबदारी गावपातळीवर महत्त्वाची आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी त्यांना अधिक क्रियाशील करण्यात येत आहे.
* कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन होत नसल्यास कार्यक्रमांशी संबंधित सर्वांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
*स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या क्षेत्रातील ही गर्दी रोखावी. राज्य सरकारने दिलेल्या सवलती व्यतिरिक्त अधिक वेळ आस्थापना सुरू असल्याचे दिसल्यास कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.


*रुग्ण आढळून आलेल्या भागात भेटी देऊन तेथील रुग्णवाढीची कारणे शोधून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात. रुग्ण आढळून येणारा भाग प्रतिबंधित करण्यात यावा. एखाद्या ठिकाणी गर्दी झाली तर तात्काळ तेथील यंत्रणांनी त्याची माहिती मिळताच कारवाई करावी.
*गावपातळीवर नेमलेली विविध पथके, ग्रामस्तरीय अधिकारी -कर्मचारी यांच्याकडून असे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई केली जावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या