Ticker

6/Breaking/ticker-posts

व्हीआयपींना दर्शन, सर्वसामान्य भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे कधी उघडणार ?

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 नाशिक : भगवान त्र्यंबकराजाच्या मंदिराचे दरवाजे २० मार्चपासून सर्वसामान्य भाविकांसाठी बंद असले तरी व्हीआयपी भाविकांना मात्र सहज दर्शन होत असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. त्यामुळे सर्वसामान्य भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे कधी उघडणार, अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. तसेच व्हीआयपींच्या देवदर्शनावरही नाराजी व्यक्त केली जात आहे.

 करोनामुळे गेल्या वर्षभरापासून देशभरातील पर्यटन आणि धार्मिक स्थळे भाविक-पर्यटकांसाठी दुरावली आहेत. मध्यंतरी काही काळासाठी दिलासा मिळाला होता. मात्र दुसरी लाट उसळी घेताच पुन्हा 'देवदर्शनावर' बंदी आली आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात देशभरातील भाविक दर्शनासाठी येतात. मात्र हे मंदिरही बंद असल्यामुळे भाविकांचा हिरमोड होत आहे.

त्यातच सोमवारी (दि. २६) १६ व्हीआयपी भाविकांसाठी त्र्यंबकेश्वर मंदिराचे दरवाजे उघडण्यात आल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. याबाबत अधिक माहितीसाठी मंदिर प्रशासन अधिकारी यांच्याशी संपर्क साधला, मात्र त्यांनी फोनच घेतला नाही. तर काही विश्वस्तांनी याबाबत आपणास काहीही माहीत नसल्याचे म्हणत कानावर हात ठेवले.

ट्रस्टची चुप्पी

काही दिवसांपूर्वी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्यात आल्याची चर्चा होती. तसेच नव्याने सेवेत समावेश करण्यात आलेल्या व्यक्तींनीही गोतावळ्यासह दर्शनाचा लाभ घेतल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे. अर्थात मंदिर प्रशासनाने यास दुजोरा दिलेला नाही. व्हीआयपींना अथवा नातेवाइकांना दर्शन दिले जात असेल तर मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये याबाबतचे दृश्य टीपले गेले असते. त्याची पडताळा करणे सहज शक्य आहे. तेदेशील ट्रस्ट करण्यास तयार नाही. याउलट सर्वसामान्य भाविकांच्या नशिबी मात्र बंद दरवाजा पुढे हात जोडण्याचीच वेळ आली आहे.

यंदाही कळसाचेच दर्शन?

येत्या आठ दिवसांत श्रावण महिना सुरू होणार आहे. त्र्यंबकेश्वरमधील काही भाविक महिनाभर तर काही सोमवारी अनुष्ठान, उपवास करतात. त्र्यंबकराजाचे दर्शन घेतात आणि मगच अन्नपाणी ग्रहण करतात. मात्र गतवर्षी करोनाने देवळाचे दरवाजे बंद होते. तेव्हा कळसाचे दर्शन घेत समाधान मानावे लागले. यावर्षी पुन्हा तशी वेळ नको आहे. निदान श्रावणात तरी देवळाचे दरवाजे उघडावेत अशी मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या