Ticker

6/Breaking/ticker-posts

बहिर्जी नाईक स्मारकाच्या भूमिपूजनाला गर्दी; पडळकरांवर गुन्हा दाखल

 *गोपीचंद पडळकर यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल.

*कोविड नियमांचा भंग केल्याप्रकरणी झाली कारवाई.

*बहिर्जी नाईक स्मारकाच्या भूमिपूजनाला झाली होती गर्दी.







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 सांगली: खानापूरमधील बाणुरगड येथे शूरवीर बहिर्जी नाईक स्मारकाच्या कोनशीला समारंभाला गर्दी जमवल्याप्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर, त्यांचे बंधू  ब्रहमानंद पडळकर यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगलीतील खानापूर तालुक्यातील बाणुरगड येथे शूरवीर बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचा कोनशीला समारंभ १९ जुलै रोजी पार पडला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ऑनलाइन पद्धतीने हा कोनशीला समारंभ झाला.

 बाणुरगड येथे या कार्यक्रमावेळी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळेच या कार्यक्रमाचे आयोजक गोपीचंद पडळकर गोत्यात आले आहेत. सांगली जिल्ह्यात सध्या कोविड नियम लागू आहेत. त्यानुसार सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी करण्यात आलेली आहे. असे असताना बाणुरगड येथील कार्यक्रमाला १५०हून अधिक कार्यकर्ते जमा करण्यात आले होते. या कार्यक्रमात कोविड नियम मोडण्यात आल्याबाबत नायब तहसीलदार चेतन कोणकर यांनी फिर्याद दिली असता त्या आधारे विटा पोलिसांनी गोपीचंद पडळकर, त्यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

फडणवीसांच्या संकल्पनेतून साकारतंय स्मारक

देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून बाणुरगड येथे शूरवीर बहिर्जी नाईक यांचे स्मारक साकरत आहे. सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करून हे स्मारक उभारले जात आहे. या स्मारकाच्या कोनशिला सोहळ्या प्रसंगी फडणवीस यांनी शिवाजी महाराजांच्या लढ्यातील योद्ध्यांची स्मारकं झाली पाहिजेत. त्यातून समाजाला नवी उर्जा मिळेल, असे म्हटले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत अनेक हिरे होते. याच हिरकांच्या कोंदणातील एक हिरा म्हणजे बहिर्जी नाईक होत. बुद्धीचातुर्य, शौर्य, स्वामीनिष्ठा, प्रखर राष्ट्रप्रेम या गुणांचा अपूर्व संगम म्हणजे बहिर्जी नाईक होते.

 युगप्रवर्तक शिवछत्रपतींनी एक आदर्श राज्यव्यवस्था निर्माण केली. अर्थातच त्यांच्या राजवटीत गुप्तहेरांचे जाळे अतिशय भक्कम होते. सुमारे तीन ते चार हजार गुप्तहेरांचे नेतृत्त्व बहिर्जी नाईक यांनी केले. बहिर्जी नाईक यांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या. गुप्तहेर खात्याची एक वेगळी भाषा बहिर्जी नाईक यांनी विकसित केली होती. ज्या काळात केवळ संशयावरून हत्या केली जात असे, त्या काळात अतिशय पक्की खबर ते काढून आणत असत. त्यांना कधीही पकडता आले नाही, असे नमूद करत स्वराज्याच्या सेनानीचे हे अतिशय सार्थ स्मारक ठरेल, अशा भावना फडणवीस यांनी व्यक्त केल्या होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या