Ticker

6/Breaking/ticker-posts

छेडछाडीला कंटाळून दहावीच्या मुलींनी उचलले टोकाचे पाऊल

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 पारनेर:  तालुक्यातील नुकतीच दहावी उत्तीर्ण झालेल्या दोघा चुलत बहिणींनी विषारी औषध सेवन केले. यात एकीचा मृत्यू झाला असून दुसरी अत्यवस्थ आहे. काही महिन्यांपासून गावातील दोघा युवकांकडून होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते. मात्र, अत्यवस्थ मुलगी शुद्धीवर आल्यानंतरच खरा प्रकार समोर येऊ शकेल, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी दोघा युवकांना ताब्यात घेतले आहे.

पारनेर तालुक्यातील पिंपळनेर गावात ही घटना घडली. दोन चुलत बहिणींनी गुरुवारी दुपारी विषारी कीटकनाशक प्राशन केले. यामध्ये एकीचा मृत्यू झाला असून दुसरीची प्रकृती गंभीर आहे. एकतर्फी प्रेमातून झालेल्या छेडछाडीतून त्यांनी हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या दोघी दहावीला होत्या. अलीकडेच निकाल लागला असून त्या चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या आहेत. गुरुवारी दुपारी त्यांनी एकत्र येत एका खोलीत विषारी औषध सेवन केले. हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आल्यावर त्यांना तातडीने शिरूरला उपचारासाठी हलविण्यात आले. त्यातील एकीचा मृत्यू झाला. परिसरातील मुलांकडून त्यांची छेडछाड केली जात होती, असे नातेवाईक आणि ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गेल्या चार महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. त्याबद्दल त्या मुलांना समजही देण्यात आली होती, असेही सांगण्यात आले.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी पिंपळनेर येथील दोन जणांना ताब्यात घेतले आहे. हे दोघेही बारावीचे विद्यार्थी असल्याचे समजते. पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अत्यवस्थ मुलगी शुद्धीवर आल्यावर तिचा जबाब नोंदविण्यात येणार आहे. त्यावेळी नेमके कारण स्पष्ट होईल. तोपर्यंत सर्व शक्यता तपासून पोलिसांनी चौकशी सुरू केल्याचे सांगण्यात आले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या