Ticker

6/Breaking/ticker-posts

राज्यात ब्रेक द चेनचा नवा आदेश नेमका काय आहे? जाणून घ्या..

 *आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाने केले स्पष्ट.

*समारंभ, धार्मिक स्थळे, हॉटेल, पर्यटनावरही मर्यादा.

 






लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 मुंबई: राज्य आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागामार्फत ब्रेक द चेनचाअंतर्गत ४ जूनपासून लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये विस्तार करण्यात आला आहे. शुक्रवारी याबाबत नवा आदेश जारी करण्यात आला असून त्यात अनेक बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. या आदेशानुसार राज्यात नेमक्या कोणत्या सवलती मिळणार आणि कोणत्या बाबतीत मनाई असणार, याचा फोड या विभागाने केला आहे. यात जमाव व मेळावे, धार्मिक स्थळ, खासगी प्रशिक्षण वर्ग कौशल्य केंद्रे, हॉटेल, पर्यटन स्थळासंदर्भात प्रामुख्याने स्पष्टीकरण देण्यात आले आहे. निर्बंधांची अंमलबजावणी करताना त्यात गैरसमज किंवा अस्पष्टता राहू नये यासाठी हा तपशील जारी करण्यात आला आहे.


जमाव/ मेळावे:
१. जमावाची व्याख्या एका सामूहिक कारणासाठी पाच पेक्षा जास्त लोकांचे एकत्रित येणेअशी करण्यात आली आहे. यामध्ये लग्न समारंभ, पार्टी, निवडणुका, प्रचार, सोसायटी बैठका, धार्मिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक कार्यक्रम, क्रीडा सामने, सामाजिक कार्यक्रम यांचा अंतर्भाव असेल. यामध्ये काही अस्पष्टता असल्यास जिल्हा 
प्रशासन जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेतील. सदर मार्गदर्शक तत्त्वे अशा अन्य जमवासाठीही लागू पडेल की ज्याचा इथे उल्लेख करण्यात आलेला नाही.


२. आपत्ती म्हणून 
कोविड-१९ जोपर्यंत अस्तित्वात असेल, तोपर्यंत १०० पेक्षा जास्त लोकांच्या जमावावर पूर्णपणे बंदी असेल. फक्त स्थानिक प्रशासन आणि वैधानिक स्वरूपाच्या जमावाला यातून सूट असेल.


३. स्थानिक प्रशासन आणि वैधानिक स्वरूपाचा जमाव

* नागरी विकास विभाग आणि ग्रामीण विकास विभागातर्फे जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वे हे ४ जूनच्या आदेशानुसार अस्तित्वात असतील.
* अत्यावश्यक कामासाठी जिल्हाधिकारी यांच्या शिफारशी अनुसार एसडीएमए/ युडीडी /आरडीडी यांच्याकडून पूर्वपरवानगी घ्यावी लागेल.
*बांधकाम होत असलेल्या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त संख्येने काम करता येणार नाही.
*खुल्या जागेच्या ठिकाणीही क्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त लोकांना काम करता येणार नाही.
* कोणत्याही संमेलन अथवा मेळाव्याचा कालावधी तीन तासांपेक्षा जास्त असू शकणार नाही.
* एखाद्या आस्थापनेच्या ठिकाणी एकापेक्षा जास्त संमेलन नियोजित केले गेले असतील तर या दोन मेळाव्यादरम्यान पुरेसा कालावधी असावा आणि तो अशा पद्धतीचा असावा जेणेकरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या पाहुण्यांमध्ये वार्तालाप आणि परस्पर संवाद होणार नाही. तसेच दोन संमेलनांच्या दरम्यान सदर ठिकाणी पूर्णपणे सॅनिटायझर व स्वच्छता करावी लागेल.


*एखाद्या आस्थापनेच्या ठिकाणी संमेलने होत असतील तर तिथल्या कर्मचाऱ्यांचे पूर्णपणे लसीकरण केलेले असावे किंवा त्यांच्या चाचण्या आवश्यक असतील.
* संमेलन अथवा मेळावे होत असलेल्या ठिकाणी वेळोवेळी सादर केलेले एसओपी यांचे काटेकोरपणे पालन करावे आणि असे होत नसल्याचे आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. जर वारंवार मार्गदर्शक एसओपींचे उल्लंघन होत असेल तर त्या आस्थापनेला पूर्णपणे बंद केले जाईल आणि जोपर्यंत कोविड आपत्ती म्हणून अस्तित्वात असेल, तोपर्यंत या आस्थापनांना उघडण्याची मुभा मिळणार नाही.


*स्तर तीन, चार आणि पाच येथील जमाव अथवा मेळाव्यांवर पूर्णपणे बंदी असेल. फक्त चार जूनच्या आदेशामध्ये नमूद केलेल्या कारणांसाठी परवानगी असेल.
*जर एखाद्या ठिकाणी खानपानासह संमेलन असेल आणि त्या ठिकाणी मास्क काढावे लागत आतील, तर अशा ठिकाणी उपाहारगृहांसाठी जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे यांची अंमलबजावणी केली जाईल. (तीन, चार आणि पाच स्तर साठी परवानगी नसेल. स्तर दोन साठी क्षमतेच्या ५० टक्के लोकांसाठी जेवण आणि स्तर एक साठी नियमित असेल.)

धार्मिक स्थळ:
*स्तर तीन, चार आणि पाच मध्ये सर्व धार्मिक स्थळ अभ्यागतांसाठी बंद असतील.
*अभ्यागतंसाठी धार्मिक स्थळ स्तर दोन मधून पूर्व परवानगी घेतल्यानंतर उघडले जातील.
*जमावाचे सर्व नियम पाळून स्तर एक मधील अभ्यागतांना धार्मिक स्थळे खुले असतील.
* धार्मिक स्थळांच्या परिसरात राहणाऱ्या व धार्मिक विधी पार पाडणारे कर्मचारी यांच्यासाठी धार्मिक स्थळे उघडे असतील, परंतु कर्मचाऱ्यांसाठी आयसोलेशन बबलआवश्यक असेल.
* स्तर तीन, चार आणि पाच मध्ये बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही धार्मिक स्थळे बंद असतील.
* ज्या धार्मिक स्थळी लग्नकार्य आणि अंतिम संस्कार केले जात असतील तिथे जमावासाठी लागू असलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल.
* कोणत्याही धार्मिक कार्य किंवा पवित्र दिवसाच्या निमित्ताने काही विशेष कार्य असल्यास त्या धार्मिक स्थळाला सर्व नियमांचे पालन करून ते पार पाडावे लागतील.

खासगी प्रशिक्षण वर्ग कौशल्य केंद्रे:
शाळा, महाविद्यालय किंवा इतर शैक्षणिक संस्थांसाठी असलेले नियम खासगी प्रशिक्षण वर्ग अर्थात कोचिंग क्लासेस आणि कौशल्य केंद्रांसाठी लागू असतील. यासाठी एसडीएमए वेगळी मार्गदर्शक तत्त्वे जारी करतील. तोपर्यंत अस्तित्वात असलेल्या नियमांचे पालन केले जाईल.

कोविड-१९ च्या व्यवस्थापनासाठी, वैद्य कौशल्याचे प्रशिक्षण अभ्यासक्रम चालवणारे कौशल्य केंद्रे हे याला अपवाद असतील. अशा प्रकारच्या वर्गांवर कोणतेही निर्बंध नसतील. परंतु त्यांना कोविड सुयोग्य वर्तन याचे पालन करावे लागेल आणि वेळोवेळी जारी केलेल्या एसओपीचे पालन करावे लागेल.

हॉटेल:
*पाहुण्यांना प्रवेशासाठी सर्व स्तरांच्या हॉटेलांना उघडे ठेवण्याची परवानगी असेल.
*वेगवेगळ्या स्तरातून येणाऱ्या पाहुण्यांच्या निर्बंधांबद्दल अंकुश ठेवण्याची जबाबदारी ही त्या हॉटेलांच्या आस्थापनेवर असतील. जर एखाद्या हॉटेल आस्थापनेला एखादा पाहुणा निर्बंधांच्या विरुद्ध प्रवास करून आल्याचे समजल्यास डीडीएमए यांना तात्काळ माहिती द्यावी लागेल. (आवश्यक सेवेत असलेले कर्मचारी तसेच वैद्यकीय आपतकालीन स्थितीत काम करणारे कर्मचारी यांना येण्याजाण्याची मुभा असेल)
*जर एखादा पाहुणा राज्याच्या बाहेरून आला असेल तर तो कोविडबाबत संवेदनशील ठिकाणाहून आलेला नाही याची खात्री हॉटेल आस्थापनेला करावी लागेल. यासाठी एसडीएमए यांनी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत आणि जर तो अशा संवेदनशील ठिकाणाहून आला असेल तर त्या संबंधीच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करावी लागेल. जर एखादा पाहुणा या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत नसेल तर त्याची माहिती तात्काळ डीडीएमए यांना द्यावी.


* हॉटेलमधील उपहारगृहे हे त्या ठिकाणी राहणाऱ्या पाहुण्यांसाठी मर्यादित असेल. तेही क्षमतेच्या ५० टक्के अटीवर आणि सर्व एसओपी यांचे पालन करून. बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांसाठी लागू असलेल्या निर्बंधांचे पालन करून सेवा देता येईल. उदाहरणार्थ पार्सल अथवा होम डिलिव्हरीइत्यादी.
* हॉटेल मधील जलतरण पूल यासारख्या सामायिक सुविधांचा उपयोग लागू केलेल्या निर्बंधांना अनुसरूनच करावा लागेल. ते आवश्यक सेवेमध्ये येत नसल्याने व नियमित सुविधांमध्ये नसल्यास इन हाऊसपाहुण्यांसाठी खुले नसेल.
*नियमांचे उल्लंघन झाल्यास दंड करण्यात येईल व वारंवार उल्लंघन केल्यास कोविड-१९ आपत्ती असल्याची सूचना अस्तित्वात असेपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात येईल.

पर्यटन स्थळे:

*एसडीएमए यांची पूर्वपरवानगी घेऊन डीडीएमए कोणत्याही प्रतिष्ठित पर्यटन स्थळांना वेगळे प्रशासकीय घटक म्हणून घोषित करू शकते. या घोषणेनंतर डीडीएमए त्या ठिकाणासाठी वेगळे स्तर देऊ शकते आणि हे या ठिकाणच्या कोविड-१९ परिस्थितीवर अवलंबून असेल. तिथल्या विविध घटकांवर हा निर्णय विसंबून असेल आणि यासाठी करोना पॉझिटिव्हिटी रेट किंवा भरलेले ऑक्सीजन बेड हे निकष नसतील. हॉटेल जवळपासच्या प्रशासकीय घटकांच्या तुलनेत एक स्तरापेक्षा जास्त कमी असता कामा नये. जर डीडीएमए यांना वाटल्यास ते अशा पर्यटन स्थळी आणखी जास्त निर्बंधही लावू शकतात.


* थर्मल स्कॅनिंग किंवा लक्षणे चाचणीसाठी डीडीएनए सीमेवर चेक पोस्ट लावू शकतात. तसेच येणाऱ्या पाहुण्यांवर त्याचे चार्ज लावू शकतात.
* अशा ठिकाणच्या पायाभूत सुविधा आणि पाहुण्यांची वर्दळ याच्या आधारे डीडीएमए अशा या ठिकाणी जास्त निर्बंध लावू शकतात.
*या पर्यटन स्थळांच्या परिसरातील सर्व हॉटेलांसाठी हॉटेलसाठीची मार्गदर्शक तत्त्वे लागू असतील. त्याच प्रमाणे डीडीएमए जास्त दक्षता घेतील आणि वेळोवेळी यावर नजर ठेवतील.
* जर हे पर्यटन स्थळ स्तर पाच मध्ये असेल तर ई-पास शिवाय कोणत्याही अभ्यागतांना तिथे येण्याची परवानगी नसेल.
*जर येणारे पाहुणे स्तर पाच प्रशासकीय घटकांमधील असेल तर त्यांना एक आठवड्यासाठी विलगीकरणात रहावे लागतील.
*पाहुणे सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करत आहेत की नाही याची खात्री करण्याची जबाबदारी त्या हॉटेल अथवा होम स्टे किंवा पर्यटक आस्थापनेची असेल. निष्काळजीपणा केल्यास पाहुणे तसेच आस्थापना व्यवस्थापनाविरोधात दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. या मार्गदर्शक तत्त्वांचे पाहुण्यांकडून किंवा हॉटेल, होम स्टे, पर्यटक आस्थापनेकडून उल्लंघन झाल्यास त्यांची परवानगी काढून घेतली जाऊ शकते आणि जोपर्यंत कोविड-१९ आपत्ती म्हणून अस्तित्वात असेल, तोपर्यंत त्यांना पुन्हा आस्थापना चालू करण्याची मुभा राहणार नाही.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या