Ticker

6/Breaking/ticker-posts

अहमदनगर मनपा निवडणूक : शिवसेना-राष्ट्रवादी युती ; मुंबईतील बैठकीत झाला मोठा निर्णय

अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासोबत झाली बैठक.









लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना  राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत. मुंबईत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महापौरपदासाठी शिवसेनेचा तर उप महापौरपदासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार देण्यावरही एकमत झाल्याचे खात्रीलायक माहीती हाती आली आहे.


अहमदनगरला सध्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपचा महापौर आहे. त्यांची मुदत ३० जूनला संपत असून कोणत्याही क्षणी निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. यावेळी भाजपकडे या पदासाठी उमेदवार नाही. काँग्रेस आणि शिवसेनेने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, पक्षीय बलाबल पहाता यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपची भूमिका महत्त्वाची ठरते. राज्यात नव्या राजकारणाची चर्चा सुरू झाल्यानंतर शिवसेनेची युती भाजपसोबत होणार की राष्ट्रवादीसोबत, यावर चर्चा सुरू होती. त्यावर आज मुंबईत झालेल्या बैठकीत पडदा पडला. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दोघांच्या युतीची सुरुवात नगरपासून झाल्याचे मानले जाऊ लागले आहे.



नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, शिवसेनेचे भाऊ कोरगावकर, संभाजी कदम, अनिल शिंदे, संजय शेंडगे, गणेश कवडे, अनिल बोरूडे यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री पवार आणि मंत्री शिंदे यांची भेट घेतली. त्यामध्ये दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. याशिवाय महापौरपद शिवसेनेकडेच देण्यावरही एकमत झाल्याचे सांगण्यात आले. शिवसेनेने रोहिणी शेंडगे यांचे नाव या पदासाठी आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे वेगळ्या काही घडामोडी झाल्या नाहीत, तर त्याच पुढील महापौर असतील, अशी चिन्हे आहेत.


पालिका सभागृहात सध्या शिवसेना २३, राष्ट्रवादी १९, भाजप १५, काँग्रेस ५, बसपा ४, सपा १ असे पक्षीय बलाबल आहे. एक जागा रिक्त आहे. सध्या शहरात काँग्रेस आणि राष्ट्रवादीत वितुष्ट आहे. पाच जागा असूनही काँग्रेसने आपला महापौरपदाचा उमेदवार सर्वांत आधी जाहीर केला होता. आता राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत युतीचा निर्णय घेतल्याने काँग्रेसपुढे मोठी नामुष्की आली आहे. पूर्वी सर्वाधिक जागा असूनही विरोधात असलेल्या शिवसेनेला आता सत्तेची संधी मिळणार आहे, तर राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या काँग्रेसची शहरात काय भूमिका असेल, याकडे लक्ष लागले आहे. एकीकडे मुंबईत महत्त्वाच्या घडामोडी सुरू असताना इकडे माजी मंत्री राम शिंदे आणि शिवाजी कर्डिले यांनी महापौर निवडणुकीत काहीही झाले तरी भाजपच किंगमेकर ठरले, अशी भूमिका मांडल्याने राजकारण चांगलंच तापत चाललं आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या