Ticker

6/Breaking/ticker-posts

जरा..गुजरात, उत्तर प्रदेशकडेही पाहा ; रोहित पवारांनी विरोधकांना सुनावलं

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 


अ.नगरः'केंद्रीय आरोग्य विभागाची आकडेवारी पाहिल्यास महाराष्ट्रा व्यतिरिक्त छत्तीसगढ, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान, गुजरात, पंजाब, बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, हरयाणा, बिहार आदी राज्यांमध्येही करोनाचं संकट भीषण असल्याचं दिसून येतं. या राज्यांपैकी सहा राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे. त्यामुळे भाजपशासित राज्यांमधील करोना व्यवस्थापन खूपच चांगलं असल्याने तिथं करोना येत नाही हा विरोधकांचा दावा फोल ठरतो. यावरून राजकारण करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी हे लक्षात घ्यावं,' अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदाररोहित पवार नी विरोधकांना सुनावलं आहे.


करोनाची राज्यातील परिस्थिती आणि त्यावरून राज्य सरकारवर होत असलेल्या टीकेला पवार यांनी सोशल मीडियातून उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे, 'भाजपचे नेते महाराष्ट्रातील करोनाच्या परिस्थितीवरुन राजकारण करणं थांबवत नाहीत, हे दुर्दैवी वाटतं. आज राजकारणाची वेळ नसतानाही महाराष्ट्रातील सरकार असमर्थ आहे, इथली आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली अशाप्रकारची विधानं विरोधकांकडून केली जात आहेत. ही गोष्ट मात्र निश्चितच खरीय की महाराष्ट्रात रुग्ण संख्या जास्त आहे आणि रुग्णांची काही प्रमाणात गैरसोय होतेय. मात्र हे संकट रोखण्यासाठी जे करणं गरजेचं आहे ते सर्व राज्यसरकार करतंय हेही तेवढंच खरंय. राज्यात परत एकदा नाईलाजास्तव कठोर निर्बंध घालण्याची वेळ सरकारवर आली.'



इतर राज्यांची तुलना करताना पवार यांनी म्हटले आहे, 'इतर राज्यांची आकडेवारी महाराष्ट्राइतकी नसली तरी त्या राज्यांच्या लोकसंख्येच्या व शहरीकरणाच्या तुलनेत ती निश्चितच चिंताजनक आहे. ज्या राज्यांमध्ये महाराष्ट्रासारखे शहरीकरण अधिक आहे तिथं रुग्णांची संख्याही अधिक असल्याचं दिसून येतं. महाराष्ट्रातही एकूण रुग्णांच्या जवळपास ५० टक्के रुग्ण हे मुंबई, ठाणे, पुणे व नागपूर अशा मोठ्या शहरांमध्येच आहेत. जर गुजरातचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर तिथंही रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून सुरत, अहमदाबाद, जामनगरमध्ये बेड मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. अनेक रुग्णांवर हॉस्पिटलच्या आवारात, फरशीवर, खुर्चीवर बसून उपचार चालू असल्याचं चित्र पहायला मिळतं. दुसरीकडं मृतांच्या नातेवाईकांना अंत्यविधीसाठी आठ-आठ तास थांबावं लागत असल्याचं विदारक चित्र पाहताना मन हेलावून जातं. रुग्णवाहिका नसल्याने कोणी चार चाकीतून मृतदेह नेतंय तर कोणी हात गाड्यावरून आहे. हे आज गुजरातचं भीषण वास्तव आहे, अस रोहित पवारांनी म्हटलं आहे.



'उत्तरप्रदेशमध्येही रुग्णांची अवस्था काही चांगली नाही. तिथं तर तीन रुग्णांना लस म्हणून रेबीजचं इंजेक्शन दिल्याची अत्यंत धक्कादायक बाब पुढं आली. बिहारमध्येही करोनाचे व्यवस्थापन नीट होत नसल्याचे निदर्शनास येतंय. तसंच मृतांची संख्याही सरकार लपवत असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या. देशभरातील सर्वच राज्य सरकार आर्थिक अचणीतून जात आहेत. एकीकडं उत्पन्न खुंटलंय तर दुसरीकडं केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेला हक्काचा निधी मिळत नाहीय. केंद्र सरकारकडं उत्पन्नाचे स्त्रोत्र अधिक असल्याने स्वाभाविकपणे केंद्राने या सर्व परिस्थितीत जास्तीची जबाबदारी घेणं अपेक्षित आहे. पण तसं होताना दिसत नाही. जगभरात करोनाची एका नंतर दुसरी लाट येते हा अनुभव सर्वांना होता. त्याप्रमाणे ती भारतातही येणार हे नक्की होतं मात्र तरीही केंद्र सरकारने गेल्या सहा महिन्यात जवळपास १०० देशांमध्ये ११ लाख रेमडेसिवीर औषधाची निर्यात केली,' असा दावाही त्यांनी केला आहे.


' मला आजच्या परिस्थितीबाबत कोणाला दोष द्यायचा नाही. मला विरोधकांनाही हेच सांगायचंय की ही वेळ एकमेकांची उणी-दुणी काढण्याची नसून एकत्र येऊन या संकटाचा मुकाबला करण्याची आहे. ही लढाई कोणत्याही एका राज्याची किंवा देशाची नसून संपूर्ण मानवतेची आहे. आमच्या विरोधकांच्या म्हणण्याप्रमाणे करोना हा केवळ एखाद्याच राज्यात वाढत नसून तो सगळीकडेच वाढतोय. या कठीण काळात सगळ्या यंत्रणेचा कस लागतोय. अशा परिस्थितीत आपण भांडत बसलो तर त्यात नुकसानच अधिक होणार आहे.' असं आवाहन त्यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या