Ticker

6/Breaking/ticker-posts

पंढरपुरात प्रचाराच्या तोफा थंडावल्या; १७ एप्रिल रोजी येथे मतदान, २ मे ला निकाल !

 




लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

पंढरपूर: एकाबाजूला करोनाचे संकट गडद होत असताना दुसऱ्या बाजूला सर्व नियम पायदळी तुडवत सुरू असलेल्या पंढरपुरात मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा गुरुवारी सायंकाळी थंडावल्या. गेले काही दिवस मोठ्या गर्दीच्या प्रचारसभा घेत राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आपली पूर्ण ताकद या निवडणुकीत पणाला लावली. गुरुवारी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भाजपने एकही प्रचारसभा घेतली नाही तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पंढरपुरात आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंगळवेढ्यात प्रचारसभा झाली

पंढरपुरात भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने प्रचारातही एकमेकांवर बरेच तोंडसुख घेण्यात आले. तरीही ही निवडणूक दोन्ही पक्षांसाठी सोपी नसून येथे अतिशय अटीतटीची लढाई होईल, असे स्पष्ट चित्र दिसत आहे. अजित पवार यांनी मतदारसंघात सभा गाजवल्या. त्यांनी भाजपच्या प्रमुख नेत्यांना लक्ष्य केले. त्यावर पलटवारही झाले. अजित पवार यांनी केलेल्या टीकेला गुरुवारी चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले. सिंचन घोटाळ्याची आठवण करून देत जास्त गमजा मारू नका, असा इशारा पाटील यांनी दिला. त्यावर मंगळवेढ्याच्या सभेत बोलताना अजित पवार यांनी प्रतिवार केला. चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फड्णवीस हे शेतकरी वाटतात का, असा सवाल करत त्यांना डिवचले. दुसरीकडे मंगळवेढ्याच्या सभेला येण्यापूर्वी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी थेट जतपर्यंत फिरून मंगळवेढ्याला कसे पाणी देता येईल याची चाचपणी केली व भाषणात पाणीप्रश्न सोडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे आश्वासन दिले. मतदारांना भुलवयाचा असा प्रयत्न दोन्ही बाजूने झाला असला तरी वर्षानुवर्षे पाण्यासाठी तडफडणारी जनता मते कोणाला देणार याचे उत्तर मतदानातूनच मिळणार आहे. १७ एप्रिल रोजी येथे मतदान होत आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील आणि शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांचा मोठा फटका बसणार असे दिसत आहे. यासोबत वंचित बहुजन आघाडी व इतर काही छोट्या पक्षांचही फटका बसेल. भाजपचे उमेदवार समाधान अवताडे याना त्यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर अवताडे हे अडचणीचे ठरले आहेत. मंगळवेढ्यात त्यांना मानणारा वर्ग असून ही मते थेट समाधान अवताडे यांच्या पारड्यातून वजा होतील, असे दिसत आहे. या सर्व समीरकरणांत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना वडिलांच्या निधनाची सहानुभूती मिळणार असेही चित्र आहे. भगीरथ यांच्या प्रचारासाठी अजित पवार चक्क चार दिवस मतदारसंघात तळ ठोकून होते. निवडणुकीची सर्व सूत्रे अजित पवार आणि जयंत पाटील यांचेकडे होती. बारामती या आपल्या मतदारसंघात अजित पवार केवळ एक शेवटची सभा घेतात. येथे मात्र ते गावोगावी जात नेत्यांच्या गाठीभेटी घेताना दिसले. अनेक नेत्यांना राष्ट्रवादीत आणून त्यांनी भगीरथ भालके यांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या बाजूने धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर आणि राम शिंदे यांनी राष्ट्रवादीला जेरीस आणण्यासाठी जोरदार प्रचार केला. त्यामुळे आता अजित पवार व जयंत पाटील यांनी उभी केलेली ताकद सरस ठरणार की देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी उभी केलेली ताकद सरस ठरणार हे २ मे रोजी निकाल लागल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या