Ticker

6/Breaking/ticker-posts

महाराष्ट्राला रेमडेसिवीर देण्यास केंद्राची बंदी; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबईः राज्यात रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. येत्या तीन ते चार दिवसांत रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवणार असल्याचा इशारा राज्य सरकारनं इशारा दिला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्राला रेमडेसिवीर देण्यास केंद्राची बंदी, असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिक यांनी सलग काही ट्वीट केले आहेत. या ट्वीटमधून त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 'केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडेसिवीरच्या कुपी विकायला परवानगी मिळत नाही आहे', असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. तसंच, केंद्र सरकार त्यांना नकार देत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

' भारतात १६ निर्यातदार आहेत ज्यांच्याकडे रेमडेसिवीरच्या २० लाख कुपी आहे. हे उत्पादन करणार्‍या ७ कंपन्यांमार्फतच रेमडेसिवीर विकले जावे असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. मात्र या ७ कंपन्या जबाबदारी घेण्यास नकार देत असल्याने आता केंद्र सरकारपुढे निर्णय घेण्याचा पेच निर्माण झाला आहे,' अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

' रेमडेसिवीर या औषधाची आवश्यकता असताना आणि उपलब्धता देखील असताना तात्काळ निर्णय घेणे ही काळाची गरज आहे. या समस्येचे निराकरण करणे आवश्यक आहे आणि राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयात ताबडतोब रेमडेसिवीरच्या कुपी पुरवल्या जाव्यात', अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.


दरम्यान, 'राज्य सरकारने १६ निर्यात कंपन्यांकडे रेमडेसिवीरबाबत विचारणा केली असता केंद्र सरकारने महाराष्ट्रात रेमडेसिवीर औषध पुरवठा करण्यास बंदी घातली आहे. जर कंपन्यांनी हे रेमडेसिवीर दिले तर त्या कंपन्यांचे परवाना रद्द केले जातील अशी धमकी त्यांना देण्यात आली आहे.'
हे अत्यंत खेदजनक आणि धक्कादायक असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

'करोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता रेमडेसिवीरची कमतरता भासू लागली असतानाच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या परिस्थितीत महाराष्ट्र सरकारकडे या १६ निर्यातदारांकडून रेमडेसिवीरचा साठा ताब्यात घेऊन गरजूंना पुरवण्याशिवाय पर्याय राहणार नाही,' असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.

आऱोप सिद्ध कराः भाजप

नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर केलेल्या आरोपांवर भाजप नेते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मलिक यांनी आरोप सिद्ध करावे अन्यथा माफी मागावी, असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच, महाविकास आघाडी सरकारनं राजकारण थांबवावं व करोना परिस्थिती कशी हाताळता येईल, याकडे लक्ष द्यावे, असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

राज्य सरकारची ही अधिकृत भूमिका आहे का?, असे असेलत तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुढे येऊन स्पष्टीकरण द्यावं. नाहीतर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचे बेछूट आरोप थांबवावेत, असंही केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या