Ticker

6/Breaking/ticker-posts

हे मोठे षडयंत्र, चौकशी होऊनच जाऊ द्या ! गृहमंत्र्यांचा स्फोटक खुलासा

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत. त्यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी तसेच मला आणि  सरकारला बदनाम करण्यासाठी रचलेले हे षडयंत्र आहे, असे नमूद करत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर हे कसे खोटे बोलत आहेत याचा फोड व्हावा म्हणून काही महत्त्वाच्या बाबी नोंदवल्या आहेत. देशमुख यांनी आधी ट्वीटरच्या माध्यमातून परमबीर यांचे आरोप फेटाळल्यानंतर आता एक सविस्तर प्रसिद्धीपत्रकच जारी केले आहे.

'गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते', असा आरोप करणारं पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहून खळबळ उडवून दिली आहे. या पत्रामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात तसेच पोलीस दलात मोठा भूकंप झाला आहे. परमबीर सिंग यांचं पत्र समोर आल्यानंतर अनिल देशमुख यांनी लगेचच ट्वीटरच्या माध्यमातून आपले म्हणणे थोडक्यात मांडत परमबीर यांचे आरोप फेटाळले होते. त्यानंतर आता देशमुख यांनी आपलं म्हणणं सविस्तरपणे मांडलं आहे व काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.

अनिल देशमुख यांनी  पुढील गोष्टींकडे वेधले लक्ष ...
* सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंग एवढे दिवस शांत का बसले होते? त्याचवेळी त्यांनी आपले तोंड का उघडले नाही?

*आपणास उद्या म्हणजे दिनांक १७ मार्च रोजी पोलीस आयुक्त पदावरून हटविण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी दिनांक १६ मार्च रोजी एसीपी पाटील यांना व्हॉटसअॅप चॅट वरून काही प्रश्न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळविली. हा परमबीर सिंग यांच्या मोठ्या कटाचा भाग होता. या चॅटच्या माध्यमातून परमबीर सिंग यांना पद्धतशीरपणे पुरावे जमा करायचे होते. या चॅटवरून उत्तरे मिळविताना परमबीर सिंग किती अधीर झाले होते हे त्यांच्या चॅट वरून लक्षात येईल. परमबीर सिंग हे एसीपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहेत. याचा अर्थ काय?  १८ मार्च रोजी मी एका कार्यक्रमामध्ये परमबीर सिंग यांच्याविरुद्ध काही गंभीर स्वरूपाच्या बाबी पुढे आल्यामुळे त्यांना पदावरून हटविले असल्याचे म्हटल्यानंतर परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचविण्याच्या दृष्टीने १९ मार्च रोजी पुन्हा व्हाट्सअॅपवर संभाषणाचे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला.

*पोलीस खात्यातील सर्वांना माहीत आहे की सचिन वाझे व एसीपी संजय पाटील हे परमबीर सिंग यांच्या अत्यंत जवळचे आहेत. १६ वर्षे निलंबित असलेल्या वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमबीर सिंग यांनी स्वतःच्या अधिकारात घेतला होता.

*  परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे आहेत त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत. मी  त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करीत आहे.

*स्वतःला वाचविण्यासाठी परमबीर सिंग यांनी हे खोटे आरोप केले आहेत.

*सचिन वाझे यांनी जर फेब्रुवारीमध्ये परमबीर सिंह यांना भेटून हे सर्व सांगितल्याचे परमबीर सिंग म्हणतात तर त्याच वेळी त्यांनी का सांगितले नाही. एवढे दिवस शांत का होते?

*विस्फोटक प्रकरणात आपण अडचणीत येऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी असे खोटे आरोप करून सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे.

*स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरन यांचा संशयास्पद मृत्यू या गंभीर प्रकरणाचा तपास भरकटविण्यासाठी परमबीर सिंग यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. असे देशमुख यानी म्हट्ले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या