Ticker

6/Breaking/ticker-posts

पंढरपूर पोटनिवडणूक: राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली; स्वाभिमानी रिंगणात?

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

पंढरपूर :-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राज्यातल्या सत्ताधारी आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. आघाडीचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक स्वतंत्रपणं लढण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीला स्वाभिमानीची ही स्वतंत्र चूल डोकेदुखी ठरणार आहे.

' राज्यात तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर साखर कारखानदारी आहे. सध्याचे सत्ताधारी नेते किंवा त्यांचे आमदार हे महाविकास आघाडीशी संबंधित आहेत अन् स्वाभिमानी शेतकरी संघटन महाविकास आघाडीसोबत आहे. त्याचाच फायदा घेऊन साखर साम्राटांनी शेतकऱ्यांच्या एफआरपीच्या कोट्यवधीच्या रक्कमा थकविल्या आहेत. दिवंगत आमदार 
भारत भालके यांच्यानंतर त्यांचा मुलगा भगीरथ भालके यांच्या ताब्यात असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यानंही शेतकऱ्यांची ऊस बिले दिली नाहीत. त्यामुळं शेतकऱ्यांत कमालीची नाराजी आहे.

दुसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमी रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या स्वाभिमानाची याच एफआरपीच्या कळीच्या मुद्द्यावर कोंडी झालीय. म्हणून स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांचा माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे स्वबळाचा आग्रह आहे. स्थानिक पातळीवर स्वाभिमानी संघटना संघर्षाच्या पवित्र्यात आहे. त्यामुळं आघडीचा धर्म पाळला जाणार का याबाबतही साशंकता निर्माण झाली आहे.

२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांत आघाडीचा धर्म पाळत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राष्ट्रवादीला मदत केली होती, मात्र आता राज्यात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळं स्वाभिमानीनं महाविकास आघाडीच्या विरोधात पावलं टाकायला सुरुवात केली आहे. रविवारी अजित पवार यांच्या दौऱ्या दरम्यानही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं निदर्शने केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत, अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल यांनी  दिली. याबाबत राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'मी सध्या दिल्लीत आहे. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. याबाबत कार्यकर्त्यांचा कौल घेऊन दोन दिवसांत निर्णय घेऊ.'

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या