Ticker

6/Breaking/ticker-posts

पतसंस्था चळवळीत ‘स्थैर्यनिधी संघाची’ भूमिका संकट मोचकची : काका कोयटे

 







लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर :- नगर मधील पतसंस्थांना गेल्या ११ वर्षापासून स्थैर्य देणाऱ्या स्थैर्यनिधी सहकारी संघाचे काम उत्कृष्ठ व प्रामाणिकपणे चालू आहे. पतसंस्था चळवळीला दिशादर्शक काम करणाऱ्या स्थैर्यनिधीचे काम माझ्या जिल्ह्यात चालू आहे हे मी राज्यभर अभिमानाने सांगत आहे .किंबहुना पतसंस्था चळवळीत स्थैर्यनिधी संघाची भूमिका ही सातत्याने संकट मोचकची राहिली आहे व यापुढेही राहील,असे प्रतिपादन राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी केले.

अहमदनगर जिल्हा पतसंस्था स्थैर्यनिधी साहाकारी संघाच्या २०१९- २० वर्षाच्या १० वी वार्षिक सर्वाधारण सभा राहुरी येथे कोविड 19 चे नियमानुसार झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे होते तर संघाचे मुख्यप्रवर्तक काका कोयटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपाध्यक्ष वसंत लोढा, संचालक शिवाजी कपाळे व्यासपीठावर उपस्थित होते.

 पुढे बोलताना कोयटे म्हनाले की, पतसंस्थांच्या ठेवींवर राज्यातील सर्वात जास्त व्याज स्थैर्यनिधी संघ देत आहे. पतसंस्था चळवळीत संकट मोचकची भूमिका करणाऱ्या स्थैर्यनिधी संघाची संकल्पना पूर्ण राज्यभर राबवावी असा ठराव सुमारे २२ जिल्हा फेडरेशनने करून सहकार खात्याकडे गेल्या अडीच महिन्यांपूर्वी प्रस्ताव दाखल केला आहे. दुर्दैवाने अद्याप सहकार खात्याने याची दखल घेतली नाहीये. पतसंस्थांना आता गुंतवणुकीचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे चांगल्या ठिकाणी गुंतवणुकीसाठी चांगले नवे मार्ग शोधण्यासाठी स्थैर्यनिधी संघाने मार्गदर्शन करावे.

यावेळी संचालक रवी बोरावके, पुखराज पिपाडा, विठ्ठलराव अभंग, बाळासाहेब उंडे, उमेश मोरगावकर, सुशीला नवले, आर.डी. मंत्री, अजिनाथ हजारे आदी उपस्थित होते. या बैठकीत विषय पत्रिके वरील सर्व विषय एक मताने मंजूर करण्यात आले. ऐनवेळच्या विषयात जिल्हा बँकेने पतसंस्थांच्या ठेवींवर 1 टक्का अधिक व्याज देण्याचा ठराव करण्यात आला.

यावेळी सुरेश वाबळे म्हणाले, स्थैर्यनिधी मार्फत पतसंस्थांचे थकीत कर्ज प्रकरणे वसूल करण्याचे काम करोनाच्या आलेल्या संकटामुळे थांबले होते. आता हे काम पुन्हा सुरु झाले आहे. जिल्हा बँकेने पतसंस्थांच्या ठेवींना अधिक व्याज द्यावा ही मागणी लवकरात लवकर मान्य व्हावी यासाठी स्थैर्यनिधी पाठपुरावा करत आहे. चांगले काम झाल्याने स्थैर्यनिधी संघाच्या सभासद, ठेवी व नफ्यातही वाढ झाली आहे हे मी अभिमानाने जाहीर करत आहे. लॉकडाऊन काळात जीव धोक्यात घालून अर्थसेवा देणाऱ्या पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करतो.

वसंत लोढा म्हणाले, स्थैर्यनिधी संघा मार्फत जिल्ह्यामध्ये कर्ज वसुलीचे चांगले काम सुरु आहे. थकीत कर्ज वसुलीच्या माध्यमातून अडचणीत आलेल्या पतसंस्थांना बाहेर काढत आहे. राज्य पतसंस्था फेडरेशनच्या मार्गदर्शनाखाली काम करत स्थैर्यनिधी संघाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पतसंस्थांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षणही देत आहोत.

बैठकीचे सुत्रसंचलन शिवाजी कपाळे यांनी केले. रवी बोरावके यांनी नफा वाटणी घोषित केला. संघाचे व्यवस्थापक महेश जाधव यांनी इतिवृत्ताचे वाचन केले. अजिनाथ हजारे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या