Ticker

6/Breaking/ticker-posts

साकळाई योजनेसाठी केंद्राने 500 कोटी रुपये द्यावेत; खा.सुजय विखे पा. यांची लोकसभेत जोरदार मागणी..!

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्ली/अ .नगर  :- नगर व श्रीगोंदा तालुक्यातील बत्तीस गावांसाठी  मृगजळ ठरलेल्या  साकळाई उपसा जलसिंचन  योजनेसाठी  वांबोरी चारीच्या धर्तीवर नाबार्ड अंतर्गत  पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन ही योजना तातडीने पूर्ण करावी, त्यासाठी केंद्र सरकारने जलशक्ती मंत्रालयामार्फत सहाय्य करावे अशी आग्रही मागणी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज लोकसभेत केली.

जनहिताच्या विशेष मुद्यांसाठी राखीव असणाऱ्या  लोकसभेचा वेळेचा उपयोग विखे पाटील यांनी खुबीने करून घेतला आहे . यावेळी बोलताना खासदार विखे पाटील म्हणाले की, नगर व श्रीगोंदा तालुक्यातील अवर्षणग्रस्त गावांसाठी साकळाई जलसिंचन उपसा योजना अतिशय महत्त्वपूर्ण  असून  देखील ही योजना कार्यान्वित होऊ शकली नाही . गेल्या तीस-चाळीस वर्षापासून या भागातील शेतकरी या योजनेसाठी संघर्ष करीत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेच्या सर्वेक्षणासाठी निधीची तरतूद देखील केली होती.

मात्र आता राज्यात महा विकास आघाडीचे सरकार आले आहे. नूतन  आघाडीचे सरकार या योजनेकडे तितकेसे गांभीर्याने लक्ष देत नसल्याची खंत देखील विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली . लोक हितासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असलेली ही योजना निधीअभावी व राज्य सरकारच्या  उदासीनतेमुळे अडकू नये, त्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणी खा. विखे पाटील यांनी केली.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये यापूर्वी स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी यापूर्वी नाबार्डच्या अर्थसहाय्यातून वांबोरी चारी उभी केली होती. त्यामुळे धरणाच्या पायथ्याशी असून देखील पाण्यापासून वंचित असणाऱ्या  गावांना कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची सोय झाली आहे. याच योजनेच्या  धर्तीवर साकळाई जलसिंचन उपसा योजनेला  केंद्र सरकारच्या मार्फत नाबाड अंतर्गत जर अर्थसाहाय्य मिळाले तर दशकांपासून संघर्ष करणाऱ्या 32 गावातील शेतकऱ्यांना  न्याय मिळेल असा विश्वास विखे पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त  केला. साकळाई उपसा जलसिंचन  योजना  विखे पाटील यांच्यामुळे थेट लोकसभेत पोहचली असून नगरसह श्रीगोंध्यातील 32 गावातील शेतकर्‍यांच्या पुन्हा एकदा आशा पल्लवित झाल्या आहेत.   

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या