Ticker

6/Breaking/ticker-posts

मनसुख मृत्यू: वाझे यांच्यावर ATS चा प्रश्नांचा भडीमार; पहाटेपर्यंत चालला जबाब

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई: ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरन यांच्या मृत्यू प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांचा जबाब दहशतवाद विरोधी पथकाने नोंदवून घेतला आहे. मनसुख हिरन यांचा मृत्यू व त्यांच्या स्कॉर्पिओ कारशी संबंधित अनेक प्रश्न एटीएसकडून वाझे यांना विचारण्यात आले. याबाबत एटीएसमधील एका अधिकाऱ्याने एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे.


मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर ज्या स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती ती कार मनसुख हिरन यांची होती. याप्रकरणात सुरुवातीला मुंबई क्राइम ब्रांच मार्फत तपास करण्यात येत होता. त्या तपास पथकात सचिन वाझे होते. दरम्यान, मनसुख हिरन यांचा मृतदेह संशयास्पदरित्या मुंब्रा रेतीबंदर येथील खाडीत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर राज्याच्या विधीमंडळात यावरून तीव्र पडसाद उमटले. विरोधी पक्षाने थेट सचिन वाझे यांचे नाव घेत आरोप केले. मनसुख यांची पत्नी विमला हिरन यांच्या जबाबाचा आधार घेत मनसुख यांच्या मृत्यू प्रकरणामागे सचिन वाझे यांचा हात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते 
देवेंद्र फड्णवीस यांनी केला. वाझे यांना निलंबित करून अटक करण्याची मागणीही करण्यात आली. मात्र सरकारकडून ही मागणी फेटाळण्यात आली. मनसुख हिरन मृत्यूचा तपा ATS कडे सोपवण्यात आला व पाठोपाठ वाझे यांची क्राइम ब्रांचमधून लोकल आर्मरी युनिटमध्ये बदली करण्यात आली.

वाझे यांची बुधवारी बदली झाल्यानंतर बुधवारी रात्रीच एटीएसने सचिन वाझे यांचा जबाब नोंदवून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. जबाबादरम्यान सचिन वाझे यांना अनेक प्रश्न विचारले गेले. मनसुख हिरन यांच्याशी आपलं नेमकं काय कनेक्शन होतं, जी स्कॉर्पिओ कार अँटिलिया बाहेर पार्क करण्यात आली होती ती तुमच्या वापरात होती का, अशी विचारणा पथकाने वाझे यांना केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वाझे यांच्यावर मनसुख यांच्या पत्नीने आपल्या जबाबात गंभीर आरोप केले आहेत. त्याबाबतही पथकाने वाझे यांना प्रश्न विचारल्याचे सूत्रांनी नमूद केले. मनसुख हिरन हे मृत्यूआधी शेवटचे नालासोपारा येथील शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख
धनंजय गावडे यांना भेटल्याचाही आरोप झाला असून याबाबतही वाझे यांना काही प्रश्न विचारण्यात आल्याचे कळते. यावेळी वाझे यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले व हिरन हे पोलीस दलातील अनेकांच्या संपर्कात होते, असे सांगितल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान, राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप बुधवारी वाजले. त्याच रात्री एटीएसमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हजेरीत वाझे यांचा जबाब नोंदवण्यात आला. गुरुवारी पहाटेपर्यंत वाझे तिथे होते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. मुख्य म्हणजे वाझे यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना आपण गुरुवारी आपले म्हणणे माध्यमांपुढे मांडणार, असे सांगितले होते. त्यानुसार गुरुवारी त्यांना माध्यमांनी गाठले मात्र वाझे यांनी आपले स्टेटमेंट काही माध्यमांना दिले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या