Ticker

6/Breaking/ticker-posts

नगरला क्रमांक एक बनविणार - पालकमंत्री मुश्रीफ यांचा निर्धार




लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर: पर्यटनाच्या दृष्टीने ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अहमदनगर शहर आणि जिल्ह्याला विकासासाठी खूप वाव आहे. एकत्रितपणे काम केल्यास येत्या २-३ वर्षात हे शहर आणि जिल्हा  राज्य व देशात क्रमांक एकचा बनेल. त्यासाठी आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. 


पालकमंत्री मुश्रीफ  यांच्या हस्ते  आज स्व. आर. आर. (आबा) पाटील सुंदर ग्राम योजने अंतर्गत यशस्वी ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके,  जिल्हा परिषदेच्या विविध विषय समिती सभापती मीरा शेटे, उमेश परहर, काशिनाथ दाते,  सुनील गडाख, जिल्ह्यातील विविध पंचायत समिती सभापती क्षितिज घुले, बाळासाहेब लटके, उर्मिला राऊत आदीं यावेळी उपस्थिती होते .


यावेळी पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचे कौतुक करीत पालकमंत्री . मुश्रीफ म्हणाले, या ग्रामपंचायतींनी आता यावरच न थांबता अधिकाधिक नावीन्यपूर्ण संकल्पना गावात राबवाव्यात. ज्या कामांमुळे हा पुरस्कार मिळाला, त्याहून अधिक सुंदर काम करण्याची प्रेरणा हे पुरस्कार देतील. सर्वांना सोबत घेत ग्रामविकासासाठी प्रयत्न केले तर महात्मा गांधीनी दिलेला खेड्यांना स्वयंपूर्ण करण्याचा दिलेला सल्ला प्रत्यक्षात आल्याचे चित्र दिसेल, असे त्यांनी नमूद केले.


गावविकासासाठी आता ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगातून मोठा निधी मिळत आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छता तसेच इतर विकासकामांसाठी हा निधी आहे. त्याचा योग्य विनियोग करुन विकास साधावा. या आयोगाचा ४ हजार ३६८ कोटी रुपयांचा  पहिला हप्ता राज्यातील ग्रामपंचायतींना उपलब्ध करुन दिला आहे. येत्या ५ वर्षात २९ हजार कोटी रुपये ग्रामपंचायतींना विकासासाठी मिळणार असल्याचे श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.


जिल्ह्यातील प्रत्येक गावांने त्यांच्या गावात प्राथमिक शाळेसाठी चांगली इमारत, अंगणवाडीसाठी इमारत आणि स्मशानभूमी असेल, याकडे लक्ष दिले पाहिजे. या बाबींच्या पूर्ततेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.  कोरोनामुळे राज्य आर्थिक संकटात असतानाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा विकासासाठी १२८ कोटी रुपयांचा अधिकचा निधी मंजूर केला तसेच चालू वर्षासाठीही पूर्णपणे निधी उपलब्ध करुन दिल्याने विकासाला गती मिळणार असल्याचे ते म्हणाले.


जिल्हा परिषद अध्यक्षा घुले यांनी, ग्रामविकास क्षेत्रात गावपातळीवर विविध विकास कामे होत असल्याचे सांगितले. पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्याकडेच ग्रामविकास विभाग असल्याने ग्रामीण भागातील अडचणी दूर होत असल्याचे त्यांनी नमूद केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भोर यांनी केले.  सूत्रसंचालन उध्दव काळा पहाड , व गौरी जोशी यांनी केले तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल यांनी मानले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या