Ticker

6/Breaking/ticker-posts

मुंडे प्रकरणात राजकारण आणू नका –संजय राऊत

 

मुंबई: - धनंजय मुंडे यांच्यावर सध्या होत असलेले आरोप वैयक्तिक कौटुंबिक आहेत. त्यात राजकारण आणणं योग्य नाही, असं रोख-ठोक   मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलंय.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री  धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेनं केलेले आरोप त्यानंतर सुरू झालेल्या राजकारणावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप राजकीय नाहीत. वैयक्तिक आहेत. त्यातून ते मार्ग काढतील. राष्ट्रवादी काँग्रेसही यावर निर्णय घेण्यास सक्षम आहे,' असं राऊत यांनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांमुळं सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसला घेरलं आहे. मुंडे यांनी राजीनामा दिल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष  यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना शिवसेनेची भूमिका मांडली.

'काही गोष्टी खासगी असतात. मुंडे यांच्यावरील आरोपांचंही तसंच आहे. तो प्रश्न त्यांच्यावरच सोडायला हवा. त्यात राजकारण आणणं योग्य नाही. राजकीय विषयावर आरोप-प्रत्यारोप करणं ठीक आहे. पण कौटुंबिक विषयात कुणीही राजकारण करू नये. कोणत्याही व्यक्तीला राजकारणात शिखरावर पोहोचण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतात. त्यामुळं चिखलफेक करून कुणी एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त करणं योग्य नाही. सर्व राजकारण्यांनी या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून आम्ही या गोष्ट शिकलो आहोत,' असं राऊत म्हणाले.

'मुंडे यांच्या प्रकरणात पोलिसांनी तक्रार दाखल करून का घेतली नाही, यावर मला काहीही बोलता येणार नाही. मात्र, या विषयाचं भांडवल केल्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार अडचणीत येईल असं कुणाला वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे,' असंही राऊत यांनी सुनावलं.   गोपीनाथ मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांचीही संजय राऊत यांनी यावेळी आठवण करून दिली. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांची पाठराखण केली होती, याकडं त्यांनी लक्ष वेधलं.

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या