Ticker

6/Breaking/ticker-posts

वीज वाहिन्यांवर वरच्यावर लटकले कर्मचारी; NDRF च्या पथकाने 'अशी' केली सुटका

 *वीजवाहिन्या जोडणीचे काम करत असताना दोन कर्मचारी नदीपात्रात लटक्ले

*एनडीआरएफच्या पथकाने  केली दोघांची सुटका







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क

पालघर : तालुक्यातील २१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मनोर येथील वैतरणा नदीच्या अलीकडे आणि पलीकडचे विजेचे खांब पडल्याने शुक्रवारी दुरुस्तीचे काम सुरू होते. मात्र शुक्रवारी नदीच्या प्रवाहातून वीजवाहिन्या जोडण्यासाठी तारा पलीकडे नेण्याचे काम सुरू असतानाच वीज वितरण कंपनीचे दोन कर्मचारी नदीपात्रात वीज वाहिन्यांवर अडकून पडले. त्यानंतर एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात येऊन या दोघांची सुटका करण्यात आली.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, २१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पालघर तालुक्यातील मनोर येथील वैतरणा नदीला प्रचंड महापूर आला होता. त्यामुळे ३३/२२/११ के.व्ही . मनोर येथील वीज उपकेंद्र मधून निघणाऱ्या ११ के.व्ही ढेकाळे उच्चदाब वीज वाहिनीचे टाकवाल खडीमशीनपाडा येथे पुराच्या पाण्यात गेलेले २ पोल जमीनीतून उन्मळून पडल्यामुळे या उच्चदाब वीज वाहिनीचा विद्युत पुरवठा त्या दिवशी ६ वाजुन ४० मि. पासून खंडित झाला आहे.

२५०० घरांचा वीजपुरवठा झाला खंडित

यामुळे या वीज वाहिनीशी संबंधित दुर्वेस, सावरा, हालोली, ढेकाळे,साये,कुडे, सातिवली, साखरे, दहिसर इत्यादी १५ गावांमधील ६५ वीज रोहित्रांवरील सुमारे २५०० वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झालेला आहे. महापुराच्या पाण्यामुळे सदर पोल पडलेल्या ठिकाणी पोहचणे व दुरूस्तीचे काम करणे अत्यंत कठीण होते. तथापि, आज २३ जुलै रोजी सकाळी टाकवाल येथील महापुराचे पाणी काहीसे ओसरल्यामुळे पडलेले पोल पुन्हा उभारण्यात आले असून तुटलेल्या उच्चदाब वीज तारा बदलण्याचे काम सुरू आहे.

दोन खांबांचे विजेच्या तारा जोडण्यासाठी वीज वितरण कर्मचारी मधुकर सातवी आणि प्रदीप भुयाळ हे कामगार विजेच्या तारांना लटकून दुसऱ्या तारा पलीकडे घेऊन चालले होते. मात्र हे वरच्या वरच अडकल्याने त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. परंतु मोहीम यशस्वी होत नसल्याने अखेर वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता संजय कोल्हे यांनी महावितरणच्या पालघर विभागाच्या अधीक्षक अभियंता किरण नागावकर यांना याबाबत तातडीने कळवले. नागावकर यांनी लागलीच पालघरचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर किरण महाजन यांना या कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्याच्या दृष्टीने एनडीआरएफच्या पथकाच्या मदतीची मागणी केली. महाजन यांनी प्रसंगावधन राखून ही मदत मान्य केली आणि ताबडतोब एक पथक तातडीने वैतरणा नदीच्या जवळ रेस्क्यू करण्यासाठी पाठवले.

या पथकाने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करून वैतरणा नदीच्या प्रचंड प्रवाहात स्पीडबोट उतरवून तिच्या सहाय्याने वीज वाहिन्यांवर अडकलेल्या दोन कामगारांना दोरीच्या साह्याने स्पीड बोट मध्ये अलगद उतरविले आणि त्यानंतर नदीकिनारी टाकवाहळ गावच्या बाजूने त्यांना उतरवण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या