Ticker

6/Breaking/ticker-posts

गृहमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच ५ हजार पेालिसांची भरती

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

औरंगाबाद : राज्यात डिसेंबरपर्यंत सुमारे ५ हजार पोलिसांची भरती करण्यात येईल. त्यानंतरच्या टप्प्यात सुमारे ७ हजार पोलिसांची भरती होईल, अशी महत्त्वाची माहिती गृहमंत्री  दिलीप वळसे पाटील यांनी दिली. औरंगाबाद पोलिस परिक्षेत्रांतर्गत कायदा व सुव्यवस्था अंमलबजावणीबाबत झालेल्या आढावा बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी कायदा सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढवण्याचे निर्देश दिले.

औरंगाबाद पोलीस परिक्षेत्रांतर्गत कायदा व सुव्यवस्था अंमलबजावणीबाबत झालेल्या आढावा बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील बोलत होते. यावेळी पोलीस महासंचालकसंजय पांडे , विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम .एम. प्रसन्ना, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील तसेच बीड, उस्मानाबाद आणि जालना जिल्हा पोलीस अधीक्षक उपस्थित होते. गृहमंत्री पुढे म्हणाले की, औरंगाबाद परिक्षेत्रातील गुन्ह्यांचे प्रमाण अधिक असल्याने पोलिसांनी अधिक सक्षमपणे तपास करणे गरजेचे आहे. पोलीस दलात कर्मचारी हा घटक महत्त्वाचा असून त्याची तपासात देखील भूमिका महत्त्वाची आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घ्या आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य द्या. लोकप्रतिनिधींच्या बाबतीत असणारा राजशिष्टाचार प्राधान्याने पाळा. डिसेंबरपर्यंत राज्यात सुमारे ५ हजार पोलिसांची भरती करण्यात येईल. त्यानंतरच्या टप्प्यात सुमारे ७ हजार पोलिसांची भरती करण्यात येईल. पोलीस सेवेत कर्मचारी दाखल झाल्यानंतर संबंधित कर्मचारी किमान पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त व्हावा, त्यादृष्टीने योजना बनविण्यात येत आहे. जिल्ह्यांमध्ये पोलीस दल अधिक सक्षम बनविण्यासाठी जिल्हा वार्षिक निधीतून निधीची मागणी करा, असेही गृहमंत्री म्हणाले. बैठकी दरम्यान उपस्थित पोलीस अधिक्षकांनी आपआपल्या जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची माहिती गृहमंत्र्यांना दिली.

 

सायबर, आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करा

तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन नागरिकांची फसवणूक करण्याच्या प्रकारात वाढ होत असून पोलिसांनी प्रभावीपणे कारवाई करत सायबर आणि आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा, असे निर्देशही दिलीप वळसे पाटील यांनी दिले. पोलिसांनी समाजातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अधिक सक्रीयपणे तपास मोहीम राबवावी. जेणेकरून गुन्हेगारांना शिक्षा होण्यात वाढ होईल, यादृष्टीने कारवाई करण्याचे निर्देशित करून गृहमंत्र्यांनी सायबर गुन्ह्यासोबतच नागरिकांचे विविध पद्धतीने होणारे आर्थिक फसवणुकीचे गुन्हे रोखण्यास प्राधान्य देऊन गुन्हेगारांमध्ये जरब निर्माण करावी, असे सांगितले. विविध समाजमाध्यमांद्वारे दैवते, प्रसिद्ध व्यक्ती, समाजपुरुष यांची बदनामी करणाऱ्या आक्षेपार्ह प्रसारणाचे प्रमाण सध्या वाढत असून त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी गृहविभाग प्रयत्नशील आहे. अधिक परिपूर्ण प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पूरक सूचना, उपाय असल्यास सादर करावे तसेच पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या सामान्य माणसाला आपुलकीची वागणूक आणि न्याय देण्याच्या जबाबदारीतून पोलिसांनी कृतीशील रहावे. पोलीस कॉन्स्टेबल पोलीस प्रशासनाचा कणा असून त्याच्या मानसिक, शारीरिक स्वास्थ्यासोबतच कौटुंबिक स्वास्थ्याची काळजी घेतली जावी, अशा सूचना वळसे पाटील यांनी दिल्या. कोरोना काळात पोलिसांनी स्वत:च्या व कुटुंबाच्या आरोग्याबाबत जोखीम पत्करत अहोरात्र काम केले आहे, त्याबद्दल सर्व पोलिसांचे अभिनंदन करून करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेतही पोलीस प्रशासनाने उत्तम कामगिरी करावी, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले.

ईडीकडे भरपूर वेळ असेल

ईडी किंवा केंद्र शासनाच्या अंतर्गत असलेल्या विविध संस्थांचा असा वापर यापूर्वी कधी झालेला नव्हता. यंदा अशा संस्थांचा वापर वाढलेला आहे. कदाचित ईडी सारख्या संस्थेकडे भरपूर वेळ असावा, अशी प्रतिक्रिया वळसे पाटील यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या