Ticker

6/Breaking/ticker-posts

शांततामय आंदोलनांचे हेच का फळ ?; मराठा आंदोलक उद्विग्न

 







लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगर: मराठा आरक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना अनेक बारीकसारीक गोष्टींचा विचार करून त्या मांडण्यात आल्या होत्या. त्यातील एकही गोष्ट कोर्टात कशी टिकली नाही? हे न पटणारे आहे. एवढी वर्षे शांततेच्या मार्गाने आंदोलन करूनही हे फळ मिळत असेल तर एकूणच यंत्रणेवरील विश्वास उडतो, अशी उद्विग्नता नगरमधून व्यक्त होत आहे. कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर सुरू झालेल्या आंदोलनाच्या निमित्ताने मराठा आरक्षणाचा मुद्दा जोरकसपणे पुढे आला होता. यासाठी सुरवातीला पुढाकार घेतलेल्यांपैकी संजीव भोर यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.



नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे जुलै २०१६ मध्ये कोपर्डी येथील शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे आधी कर्जत तालुक्यात आणि त्यानंतर राज्यभर उद्रेक झाला. घटनेचा निषेध करण्यासाठी मोर्चे निघाले. त्यानंतर यालाच जोडून मराठा आरक्षणाची मागणी पुढे आली आणि राज्यभर मराठा क्रांती मोर्चे निघाले.


आज सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणासंबंधी निकाल आल्यावर नगरमध्येही त्याचे पडसाद उमटले आहेत. कोपर्डीच्या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असली तरी वरिष्ठ न्यायालयात ते प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. तर दुसरीकडे त्यातून पुढे आलेल्या मराठा आरक्षणासंबंधी हा निर्णय आल्याने कार्यकर्त्यांनी उद्विग्नता व्यक्त केली आहे.



यासंबंधी भोर म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल अनपेक्षित आहे. सर्व कायदेशीर बाजू अभ्यासपूर्ण आणि पोटतिडकीने मांडण्यात आल्या होत्या. सर्व बारीकसारीक गोष्टींचा विचार करून कायदेशीर बाजू मांडण्यात आली होती. मात्र, यापैकी कोणतीही गोष्ट न्यायालयात का टिकली नाही, याचे आश्चर्य वाटते. या मागणीसाठी जे लाखोंचे मोर्चे निघाले, त्यांचे जगभरात कौतूक झाले. संयम आणि शांततेच्या मार्गाने काढण्यात आलेल्या मोर्चांचे शेवटी जे फळ मिळाले, ते निराश करणारे आहे. यामुळे यंत्रणेवरील विश्वास उडून कार्यकर्त्यांच्या मनात उद्रेकाचा विचार येऊ शकतो. हा निकाल ज्या पार्श्वभूमीवर देण्यात आला, तीही विचार करायला लावणारी आहे. सध्या करोनाचा उद्रेक झाल्याने देशभरात वेगळे वातावरण आहे. त्यातच पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वातावरणही ढवळून निघाले आहे. अशा काळात हा महत्वाच्या प्रकरणाचा निकाल आला आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे. आता पुढे काय भूमिका घ्यायची, हे सर्वानुमते ठरविण्यात येणार आहे.



येथील ज्येष्ठ वकील अॅड. सुरेश लगड यांनी म्हटले आहे की, ‘सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंबंधी दिलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा. यासंबंधीच्या सर्व बाजू विचारात घेऊन निर्णय व्हावा, अशी मागणीवजा विनंती आम्ही करीत आहोत.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या