Ticker

6/Breaking/ticker-posts

हल्ला करणारा बिबट्या सकाळी आढळला मृतावस्थेत: बिबट्याचा मृत्यू उपासमारीमुळे?

 





लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

पारनेर: अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील कळस येथे मंगळवारी रात्री बिबट्याने दोघांवर हल्ला केला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, सकाळी हा बिबट्या तेथे मृतावस्थेत आढळून आला. उपासमारीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. वनविभागाने पंचनामा करून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.

 कळस गावातील मेंढे मळ्यातील पोपट येवले(वय ७२) व सुदर्शन घाड्गे(वय ३०) या शेतकऱ्यांवर मंगळवारी बिबट्याने हल्ला केला. सायंकाळी शेतातील कामे उरकून घरी जात असताना हा हल्ला झाला. यावेळी सोबत असणाऱ्या महिलांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने पळ काढला. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही जखमींना आळेफाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येवले यांच्या मानेवर तर घाडगे यांच्या हातावर जखमा झाल्या असून दोघांची प्रकृती स्थिर आहे.

बुधवारी सकाळी तेथील एका शेतात शेतकऱ्यांना बिबट्या निपचित पडला असल्याचे दिसले. त्यांनी ही माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. वन विभागाच्या पथकाने पाहणी केली असता बिबट्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. बिबट्या काही दिवसांपासून उपाशी असल्याने भुकेने व्याकूळ होऊन त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. बिबट्याचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यावेळी सहाय्यक वनसंरक्ष एस.एस.पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी सीमा गोरे, वनपाल नाना जाधव, संदीप भोसले, एस.एस.जाधव, छबु रोडे, वनरक्षक हरी आठरे, उमेश खराडे, गजानन वाघमारे उपस्थित होते.

बिबट्याने रात्री शेतकऱ्यांवर हल्ला केल्यानंतर परिसरात घबराट आणि संतापही होता. त्यानंतर सकाळी तो बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. प्राथमिक अंदाजानुसार हा मृत्यू उपासमारीमुळे झाला असावा. बरेच दिवस शिकार न मिळाल्याने मंगळवारी रात्री त्याने शिकारीचा प्रयत्न केला मात्र, त्यात त्याला यश आले नाही. दोन शेतकऱ्यांसोबत एका गायीवरही त्याने हल्ल्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याला यश आले नव्हते. त्यामुळे त्याचा मृत्यू उपासमारीने झाल्याचा अंदाज आहे, मात्र वनविभागाचे अधिकारी सर्व शक्यता पडताळून पाहत असल्याचे सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या