Ticker

6/Breaking/ticker-posts

करोना : अशीही गांधीगिरी! नियम मोडणाऱ्या गावकऱ्यांसमोर सरपंचाचा साष्टांग दंडवत..!

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर: करोनाचे रुग्ण वाढत असल्याने सरकारने संचारबंदी लागू केली, नियम कडक केले. गावातही करोना बाधित रुग्ण सापडत आहेत. प्रबोधन केले, दंवडी दिली तरीही ग्रामस्थ ऐकत नाही. गावाच्या पारावर गप्पा मारत बसतात. अशा ग्रामस्थांसमोर शेवटी सरपंचाने साष्ट्रांग दंडवत घालण्यास सुरुवात केली आहे. तेव्हा कोठे ग्रामस्थ विनाकरण गर्दी करणे टाळू लागले आहेत. नगर तालुक्यातील कामरगावचे सरपंच तुकराम कतोरे यांनी हटवादी ग्रामस्थांसमोर हतबल झाल्याने हा अनोखा गांधीगिरीचा मार्ग स्वीकारला आहे.

नागरिक नियम पाळत नसल्याने करोनाचा संसर्ग वाढत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, तरीही नागरिक यातून बोध घेताना दिसत नाहीत. नगर -पुणे महामार्गावर नगर तालुक्यातील 
कामरगाव येथेही अशीच स्थिती आहे. संचारबंदीचे नियम कडक केले असले तरी ग्रामस्थ आपल्या सवयी सोडण्यास तयार नाहीत. उन्हाळ्यामुळे अनेकांच्या शेतातील कामे बंद आहेत. हे ग्रामस्थ गावातच असतात. पारावर बसून गप्पा मारणे, पत्ते खेळणे, मोबाइलवर गेम खेळत बसणे याशिवाय भाजी आणि किराणा दुकानात गर्दी, वेशीजवळ, अन्य सार्वजनिक ठिकाणी रेंगाळून गप्पा मारणे असे प्रकार होत असल्याचे दिसून येते. दुसऱ्या लाटेत गावातील २५ ते ३० लोकांना करोनाची लागण झाली आहे. त्यातील दहा-बारा जण अद्याप उपचार घेत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून लोकांना सतत आवाहन केले जात आहे. विविध माध्यमांतून गावकऱ्यांचे प्रबोधन केले जात आहे.

गावात दवंडी देऊन नियमांची माहिती दिली जात आहे. लोकांना गर्दी न करण्यासंबंधी विनाकारण घराबाहेर न पडण्यासंबंधी सूचना देण्यात येत आहेत. तरीही अनेक ग्रामस्थ ऐकायला तयार नाहीत. सरपंच कातोरे यांची तळमळ सुरूच आहे. ते गावात फिरून विनाकारण बसलेल्या ग्रामस्थांना तेथून उठवून घरी जायला सांगतात. काही ग्रामस्थ ऐकतात, काही जण त्यांनाच दुरूत्तरे देतात. अशा न ऐकणाऱ्या ग्रामस्थांना सरपंच कातोरे साष्टांग दंडवत घालून विनंती करतात. आपल्यासमोर गावचा सरपंच लोटांगण घालताना पाहून ग्रामस्थांवर फरक पडतो.

याबद्दल सरपंच कातोरे यांनी सांगितले की, ‘महत्त्वाचे काम असेल तर लोकांनी घराबाहेर पडले तर हरकत नाही. मात्र, तासंतास पारावर निर्थक गप्पा मारत बसणे, मोबाईलवर गेम खेळत बसणे हे योग्य नाही. सध्या करोनाचे भयानक संकट सुरू आहे. त्यासाठी नियम करण्यात आलेले असले करी आपली आपण काळजी घेणे कधीही योग्य आहे. जोपर्यंत लोकांच्या मनातून बदल होत नाही, तोपर्यंत कायदे आणि नियमांचाही उपयोग होत नाही. हेच आम्ही लोकांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याचा काही प्रमाणात फायदा होताना दिसून येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या