Ticker

6/Breaking/ticker-posts

वाझे प्रकरणाचा धसका; मुंबई पोलिसांच्या कारवाया थंडावल्या !



 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क 

मुंबई:- पोलिसानेच स्फोटके ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर मुंबई पोलिस दल हादरले आहे. सचिन वाझे यांच्यासोबत आणखी काही अधिकारी आणि कर्मचारी यांची नावे याप्रकरणात पुढे येत असल्याने, पोलिसांनी चंगलाच धसका घेतला आहे. एक दोन अपवाद वगळता मुंबई पोलिस दलामध्ये मोठ्या कारवाया थंडावल्या आहेत. पोलिस तसेच गुन्हे शाखेच्या कामगिरीची पत्रके, तसेच पत्रकार परिषदांना सध्या ब्रेक लागला आहे. पोलिसांची प्रतिमा धुळीस मिळविणाऱ्या या प्रकरणात पुढे काय घडते आहे? आणखी कुणाचा सहभाग आढळतो आहे ? याकडे पोलिसांसह सर्वसामन्यांचेही लक्ष लागले आहे.

 उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाजवळ २५ फेब्रुवारीला अडीच किलो जिलेटीन भरलेली स्कॉर्पिओ कार सापडली. यामुळे देशभरातील सर्वच यंत्रणांची झोप उडाली. मुंबई पोलिस दल आणि गुन्हे शाखा देखील या घटनेमुळे खडबडून जागी झाली. तपासादरम्यान या घटनेत मुंबई पोलिस दलातील वादग्रस्त अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. मुंबई पोलिस दलासाठी हा त्याहून मोठा धक्का होता. याच प्रकरणामुळे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली. वाझेंसोबत यामध्ये आणखी काही पोलिस सहभागी असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेने प्रचंड धसका घेतला आहे. मुंबई पोलिस आयुक्तालयात २७ फेब्रुवारीला सायबर पोलिसांची पत्रकार परिषद झाली होती. त्यानंतर कालची (गुरुवार) अंधेरी पोलिसांची पत्रकार परिषद वगळता एकही पत्रकार परिषद झाली नाही. मालमत्ता कक्षाच्या पथकाने एक बोलबच्चन टोळी पकडली. त्यांचे पत्रक गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आले. यावरून मुंबई पोलिस दलातील प्रत्येक जण वाझे प्रकरण आणि त्यामुळे घडणाऱ्या घडामोडींमुळे दडपणाखाली असल्याचे दिसून येते.

सचिन वाझे यांना हे सर्व करण्यासाठी पोलिस दलात असलेल्या त्यांच्याच गोटातील काहींनी मदत केल्याचे म्हटले आहे. यात मुंबईसह ठाण्यातील काही अधिकाऱ्यांचा सहभाग आहे, असे कळते. एनआयए आणि एटीएसच्या रडारवर हे अधिकारी असून, त्यांना कधीही चौकशीला सामोरे जावे लागू शकते.

मुंबईत ९४ पोलिस ठाणी असून, गुन्हे शाखेची सुमारे १५ युनिट्स आहेत. याबरोबरच नव्याने सायबर पोलिस ठाणी सुरू करण्यात आली आहेत. मुंबईत दैनंदिन घडणाऱ्या घटना, गुन्हे यांचे प्रमाण पाहता पोलिसांकडून वेगवेगळ्या कारवाई सुरूच असतात. मात्र, सचिन वाझे प्रकरणामुळे वरिष्ठ पोलिस अधिकारी यांची मानसिकता नसल्याने पोलिस विनाकारण कोणते प्रकरण उकलण्यासाठी धजावत नाहीत. त्यातच एखादी साधी चूकही मुंबई पोलिस दलास पुन्हा अडचणीत आणू शकते त्यामुळे सावधगिरीने काम करा, असे नवे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी बजावल्याने मुंबई पोलिस सध्या आस्ते कदम टाकत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या