Ticker

6/Breaking/ticker-posts

शिवसेनेचा सर्जिकल स्ट्राईक यशस्वी; जळगावात शिवसेनेचा महापौर..!

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

जळगाव: जळगाव महानगरपालिकेतील महापौर निवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या नाकावर टिच्चून विजय मिळवला. या निवडणुकीपूर्वी भाजपच्या 27 नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे विजय संपादित केला. त्यामुळे महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांचा विजय झाला. या निवडणुकीत बहुमतसाठी 38 मतांची गरज होती. जयश्री महाजन यांनी 45 मते मिळाली. तर भाजपच्या प्रतिभा कापसे यांना 28 मते मिळाली. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार कुलभूषण पाटील यांनी बाजी मारली. शिवसेनेचा हा विजय जळगावमधील गिरीश महाजन यांच्या वर्चस्वाला धक्का मानला जात आहे.

 

काही दिवसांपूर्वी सांगली महागनरपालिकेतही भाजपकडे पुरेसे संख्याबळ असूनही महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला होता. तर उपमहापौरपद काँग्रेसला मिळाले होते. त्यामुळे आता सांगलीपाठोपाठ महाविकासआघाडीने जळगावातही भाजपचा टप्प्यात आल्यावर अचूक कार्यक्रमक केल्याचे बोलले जात आहे.

या निवडणुकीसाठी ऑनलाईन मतदान घेण्याला भाजपने विरोध केला होता. महापौरपदासाठी प्रत्यक्ष मतदान व्हावे, असा आग्रह धरत भाजपने न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली होती.
ऑनलाईन मतदानाला सुरुवात झाल्यानंतर शिवसेनेने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. निवडणूक होण्यापूर्वीच जळगाव महानगरपालिकेच्या आवारात शिवसेनेच्या विजयाचे बॅनर्स झळकायला लागले होते.

जळगाव पालिकेतील पक्षनिहाय संख्याबळ

एकूण नगरसेवक: 80

भाजप : 57
शिवसेना : 15
एमआयएम : 3
स्विकृत नगरसेवक : 5 (मतदानाचा हक्क नाही)

एकनाथ शिंदे-गुलाबराव पाटलांचे डावपेच

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडे महापालिकेची जबाबदारी सोपवली होती. मात्र, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गुलाबराव पाटील यांनी राजकीय डावपेच आखत भाजपच्या 27 नगरसेवकांना आपल्याकडे ओढण्यात यश मिळवले होते.

बंडखोर नगरसेवक थेट ठाण्यात

विशेष म्हणजे हे 27 नगरसेवक शिंदे यांना भेटण्यासाठी ठाण्यात दाखल झाले होते. हे नगरसेवक ठाण्यातील एका हॉटेलमध्ये थांबले होते. हे नगरसेवक स्वत:च्या मर्जीने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना भेटायला आल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले होते.

निधी नसल्यामुळेच नगरसेवकांचं बंड?

पालिकेत सत्ता आल्यानंतरही जळगाव पालिकेला भाजपच्या काळात निधी मिळाला नाही. आताही वर्षभरात केंद्राचा निधी वगळता जळगाव पालिकेला निधी मिळाला नाही. त्यातच कोरोनामुळे पालिकेला आर्थिक चणचण भासत आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक बेचैन होते. भाजपच्या नगरसेवकांची हीच बेचैनी हेरून शिंदे-पाटील यांनी या नगरसेवकांभोवती जाळं फेकलं आणि त्यात हे नगरसेवक सापडल्याचा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या